विजेच्या धक्क्याने शेतकरी महिलेचा मृत्यू
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातिल केसलवाडा येथे शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. बायजाबाई चिंतामन मलेवार (५०) असे मृत महिलेचे नाव आहे. ती शेतात कामासाठी जात असता त्यांच्या शेताशेजारी साठवणे या इसमाचे शेत आहे. पाळीव प्राणी किंवा वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान होवू नये यासाठी साठवणे यांनी आपल्या शेताभवती विद्युत तारा लावल्या आहेत. या तारांना विद्युत प्रवाह सोडून ठेवण्यात आला होता. बायजाबाईचा पाय या जिवंत तारावर पडला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रात्री प्राण्यांपासून शेतमालाचे नुकसान होवू नये या उद्देशाने बरेच शेतकरी विद्युत तारा लावतात. मात्र त्या पहाटे काढूनही घेतात पण या दिवशी साठवणे यांनी पहाटे तारांमधील विद्युत प्रवाह काढून घेतला असता तर महिलेचा जीव गेला नसता. संबंधीतावर कारवाई व्हावी अशी मागणी मलेवार कुटुंबीयांनी केली. शासकीय योजनांतर्गत शेत कुंपन योजना राबविली जाते ती अपुरी पडत असल्याने किंवा त्याची प्रभावीपणे अमलबजाणी होत नसल्याने शेतकरी असा मार्ग अवलंबवितात. त्यात बरेचदा निष्काळजीपणा असल्यामुळे जनावर आणि मानवांचा देखील जीव गेल्याच्या घटना वारंवार घडत आलेल्या आहेत.