गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- 90 च्या दशकातील सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून गोंविदाला आळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकीय इनिंग सुरु करणार असल्याचे बोललं जात होतं.
अखेर अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश करत शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आहे. गोविंदाला यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे तिकीट मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. तर अभिनेत्री करीना कपूर आणि करिष्मा कपूर या शिवसेनेच्या स्टार प्रचारक असणार असल्याचे माहिती समोर आली आहे
काही आठवड्यांपूर्वी लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. येत्या 19 एप्रिलला महाराष्ट्रातील पहिल्या 6 जिल्ह्यात मतदान पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता अभिनेता गोविंदा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतरच गोविंदा हा लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात होतं. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत गोविंदाचा पक्षप्रवेश झाला.
अमोल किर्तीकरांविरोधात गोविंदा निवडणुकीच्या रिंगणात
अभिनेता गोविंदाच्या पक्षप्रवेशानंतर तो उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. गजानन किर्तीकर यांचं वय लक्षात घेता, त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा, याच पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता महायुतीकडूनही या जागेवर चर्चेतील चेहरा देण्याच्या हालचाली सुरु आहेत. यासाठी अभिनेता गोविंदा यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विविध पक्षांकडून सेलिब्रिटी मंडळींनाही मोठी संधी दिली जात असल्याचे बोललं जात आहे. काही सिनेकलाकार हे विविध पक्षांचे स्टार प्रचारक देखील असण्याची शक्यता आहे. महायुतीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांची नाव असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान याआधीही 2004 मध्ये गोविंदाने काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्याने भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता.