कोरोना , केंद्राच्या आर्थिक असहकार ; संकटाचा सामना करत महाविकास आघाडी दमदार :- पालकमंत्री अशोकराव चव्हाण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळातच कोरोना ( Corona Virus ) महामारीचे संकट आणि केंद्र सरकारने राज्याशी पुकारलेला असहकार या दोन्ही संकटांचा युद्धपातळीवर मुकाबला करत राज्य सरकार टिकून आहे. आज सरकारची दोन वर्ष पूर्ण झाली असून, जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यात सरकारला यश आले आहे.
यापुढेही आत्मविश्वासाने आणि मजबुतीने महाविकास आघाडी जनतेचे काम करेल, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. कोरोना या जागतिक महामारीमुळे राज्याच्या तिजोरीला १ लाख ५७ हजार कोटींचा फटका बसला. परंतु, या परिस्थितीतही नैसर्गिक संकटात सापडलेल्या सामान्य जनतेला खंबीरपणे साथ देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. यामध्ये जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी अल्पावधीतच हजारो खाटांची उपलब्धता करुन लाखो नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम या सरकारने केले. त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी योजनेत ३०.७७ लाख शेतकऱ्यांना १९ हजार ६४४ कोटी रुपयांचा लाभ दिला. पिकांच्या नुकसानभरपाईपोटी एनडीआरएफच्या निकषाहूनही अधिक मदत देणारे दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जाहीर केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. क्यार, महाचक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ यातून बाधित झालेल्या नागरिकांना ८ हजार ३५६ कोटी तर गारपीट, अवेळी पाऊस, शेतीचे नुकसान, अतिवृष्टी आदींचा फटका बसलेल्या नागरिकांना ३ हजार ३९६ कोटी असे एकूण ११ हजार ७५२ कोटी रुपये देण्याचे काम सरकारने केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
राज्य सरकारची केंद्राकडून आर्थिक कोंडी
महाविकास आघाडी सरकार कोरोना या महामारीबरोबरच नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असताना, केंद्राने राज्याच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे. परंतु, केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. जीएसटीचा राज्याचा वाटा आणि परतावा वेळेवर दिला नाही. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या, पालघर येथील साधूंचे हत्याकांड अशा प्रकरणात जाणीवपूर्वक राज्य सरकारची बदनामी केले. सरकारमधील नेत्यांच्या पाठीमागे केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा लावला. परंतु, सरकारच्या प्रामाणिकपणामुळे आजघडीला राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये जनतेने भाजपला जागा दाखवून देण्याचे काम केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
एनसीबीच्या कारवाईचे चव्हाणांकडून समर्थन
नांदेड जिल्ह्यात एनसीबीच्या पथकाने गांजाप्रकरणी केलेल्या कारवाईचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी समर्थन केले. जनहितासाठी अशा प्रकारच्या कारवाई होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्यात ज्याठिकाणी दंगली घडविण्याचा कट काही समाजकंटक तसेच काही संघटनांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल, असेही चव्हाण म्हणाले.