दारव्हा दिग्रस व पुसद भागातील नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी ; सर्व्हेक्षणासाठी टिम वाढविण्याचे पिक विमा कंपनीला निर्देश…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 6 ऑक्टोबर :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दारव्हा, दिग्रस व पुसद उपविभागात भेट देवून अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. पीक विमा कंपनीतर्फे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सर्व्हेक्षणाचे काम संथ गतीने सुरू असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली व सर्व्हेक्षणासाठी टिम वाढवून नुकसानग्रस्त शेतीचे सर्व्हेक्षण तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी यांनी संबंधीत तालुक्याचे ठिकाणी आढावा बैठक घेवून पीक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी जनजगृती करण्याचे तसेच ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन मोबाईचा वापर करता येत नाही त्यांना महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी नोंदविण्यासाठी मदत करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी येडगे यांनी आरोग्य विभागाचाही आढावा घेवून कोरोना लसिकरणासाठी विशेष मोहिम राबविण्याचे व पुढील दोन महिन्यात 100 टक्के लसिकरणाचे उद्दिष्ट पुर्ण करण्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी येडगे यांनी जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडे मदतीचा अहवाल पाठविण्यात आला असून मदत निधी प्राप्त होताच लवकरच संबंधीत शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल, असे शेतकऱ्यांशी संवाद साधतांना सांगितले.
तहसिलदार सुभाष जाधव यांनी दारव्हा तालुक्यात 43 हजार 817 शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्याचे सांगून आतापर्यंत 8 हजार 954 शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी नोंदविल्याचे व पीक विमा कंपनीतर्फे आतापर्यंत 1661 सव्हेक्षण करण्यात आले असल्याची माहिती दिली.
यावेळी संबंधीत तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच पिक विमाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.