लोकशाही दिनात 116 तक्रारी प्राप्त ; प्रलंबित तक्रारी मुदतीत निकाली न काढल्यास दंडात्मक कारवाई करणार :- जिल्हाधिकारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 4 ऑक्टोबर :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज एक स्विकृत व 115 अस्विकृत अशा एकूण 116 तक्रारी प्राप्त झाल्या. लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर दोन दिवसात कार्यवाही सुरू करण्यात यावी, तसेच मागील तीन महिन्यापुर्वीचे अर्ज सात दिवसात निकाली काढावे, सदर प्रलंबित तक्रारी पुढील लोकशाही दिनापुर्वी निकाली न काढल्यास संबंधीत कार्यालय प्रमुखांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.
प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तसेच इतर सर्व विभाग प्रमुख/अधिकारी बैठकीस हजर होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी लोकशाही दिनात मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत असून कार्यालय प्रमुखांनी त्यांचे स्तरावर जादा वेळ देवून तक्रारींचा निपटारा करावा जेणेकरून लोकशाही दिनात जास्त अर्ज येणार नाही, असे सांगितले. तसेच लोकशाही दिनातील प्रकरणे प्रदिर्घ कालावधी पासुन प्रलंबीत असलेली प्रकरणे सात दिवसाच्या आत निकाली काढण्याचे व एक महिण्यापेक्षा जास्त काळ कोणतीही स्विकृत व अस्विकृत तक्रार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी विभागप्रमुखांना सांगितले.
लोकशाही दिनाला अतिरिक्त पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, उपवनसंरक्षक केशव वाबळे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, भूसंपादन अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी पी.एस.चव्हाण, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, महिला व बालकल्याण अधिकारी ज्योती कडू, समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी तसेच इतर सर्व विभागाचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.