जिवंत विद्युत तारांच्या घर्षणाने आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचा ऊस जळून नुकसान
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अनिल बोम्पीलवार
हिवरा संगम :
शेतकरी आपल्या शेतात वर्षभर राबराब राबून आपल्या पिकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतो .कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकटाचा सामना करून आपल्या पिकाला वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड असते, पण तरीही काही अनपेक्षित आलेल्या संकटाने सुध्दा शेतकऱ्याचे अनेक प्रकारे नुकसान होत आहे. असाच प्रकार, दिनांक 17 सप्टेंबर ला हिवरा संगम येथील प्रगतिशील शेतकरी महादजी धोंडीराव कदम यांच्या, शेतातील लोंबकळलेल्या जिवंत विद्युत तारांच्या घर्षणाने आग लागून सुमारे दोन एकर मधील अंदाजे दोन लाख रुपयांचे ऊसपीक जळून खाक झाले.
याबाबतची तक्रार महादजी कदम यांनी महागाव पोलीस स्टेशन व महावितरण कडे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मुडे, वरिष्ठ वीज तंत्रज्ञ रामेश्वर राऊत, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी रामहरी खंदारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे.
याच शेतकऱ्यांचे मागील वर्षी सुद्धा जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने दोन दुधाळ म्हशी गतप्राण होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत महावितरणकडून अद्याप संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही.