..आता पगार कसे करायचे? अशा मनस्थितीत आम्ही आलो होतो : उपमुख्यमंत्रीअजित पवार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यात साधारण मार्च १५ पासून करोनाचं संकट सुरू झालं. तेव्हापासून पोलीस आणि आरोग्य विभागासह इतर कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. तुमच्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या दरम्यान अर्थमंत्री म्हणून काम करत असताना मला जाणवलं की, मार्च महिन्यात टॅक्स स्वरूपातील जी काही रक्कम येते ती बऱ्याच प्रमाणात कमी आली, शिवाय केंद्राकडून जीएसीटचा हिस्सा देखील कमी आला, त्यामुळे आता पगार कसे करायचे अशा मनस्थितीत आम्ही आलो होतो. परंतु करोनारूपी संकटात लढणारा पोलीस वर्ग असेल किंवा वैद्यकीय विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग या सारखे विभाग असतील या विभागातील लोकांना खऱ्या अर्थाने मदत झाली पाहिजे, अशी आम्ही भूमिका स्वीकरलीअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गाशी संवाद साधताना बोलून दाखवले
करोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच शहराच्या सध्य परिस्थितीच्या आढाव्याची बैठकही आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आपल्या राज्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना देखील करोनाची लागण झाली. या आजारावर अनेकांनी मात केली. मात्र काहींचा मृत्यू देखील झाला आहे. या घटना दुर्देवी असून अशा घटना घडू नयेत. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत सरकार कडून करण्यात येत आहे. मात्र, अशी वेळ कुणावरही येऊ नये असे म्हणत, सर्वजण ठणठणीत रहा आणि काळजी घ्या असे त्यांनी आवाहन केले. आमच्याकडून जे काही शक्य असेल ते करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी कायम असल्याचेही त्यांनी बोलून दाखलवे.