णी कुठे उपचार घ्यावे, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आजाराबद्दल राजकारण करणे गलिच्छपना अशोकराव चव्हाण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
आजारी माणसाबद्दल राजकारण करणे गलिच्छपणाचे लक्षण आहे, हे राजकारण कोण करतंय मला माहित आहे. कुणी कुठे उपचार घ्यावेत, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनाच्या उपचारावरून टिका करणाऱ्या विरोधकांना सुनावले आहे. नांदडमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अशोक चव्हाण पुढील उपचारासाठी मुंबईतील खाजगी रुग्णालयात गेले होते. यावरुन त्यांच्यावर नांदडेमध्ये चांगले उपचार होत नाहीत का? असा सवाल करत सोशल मिडियातून टिका होत होती. त्याला अशोक चव्हाण यांनी आज उत्तर दिले.
कोरोना आजारातून बरे होऊन अशोक चव्हाण हे काही दिवसांपुर्वीच नांदेडला परतले आहेत.विधान परिषदेच्या निवणुकीसाठी मुंबईला जाऊन आल्यानंतर चव्हाण यांनी नांदेडमध्ये कोरोनाची चाचणी करून घेतली होती. त्यांचा तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अशोक चव्हाण हे राज्यातील दुसरे कोरोना बाधित मंत्री ठरले होते.
कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर अशोक चव्हाण यांना तातडीने उपचारासाठी मुंबईला हलवण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत होती. परंतु केंद्र सरकारने काही नियमांचा दाखला देत विमान उड्डाणास परवानगी नाकारल्याची देखील चर्चा होती. त्यानंतर कार्डियाक ॲम्बुलन्सने अशोक चव्हाण यांना मुंबईला हलवण्यात आले होते.
मुंबईच्या खाजगी इस्पितळात चौदा दिवस उपचार घेतल्यानंतर अशोक चव्हाण नांदेडात परतले असले तरी सध्या ते होम क्वारंटाईन आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये उपचार न घेता मुंबईला जाऊन खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यावरून त्यांच्यावर सोशल मिडियावर विरोधकांकडून टिका सुरू आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांना देखील अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांच्या सारखे उपचार मिळतील का? असे प्रश्न विचारले जात होते.
सुरुवातीला अशोक चव्हाण यांनी या टिकेकडे दुर्लक्ष केले, पण टिकेचे प्रमाण वाढतच असल्याने त्यांनी आज आपल्या विरोधकांना सुनावले. आपल्या फेसबुक पेजवरूनच त्यांनी हा सगळा प्रकार कोण करतंय हे आपल्याला माहित असल्याचे सांगत, कुणी कुठे उपचार घ्यावेत, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. यावरून राजकारण करणे म्हणजे गलीच्छपणाचा कळस असल्याचे म्हटले आहे.
मला कोरोनाची लागण झाली तेव्हा, नांदेडसह राज्यातील हजारो लोकांनी लवकर बरे व्हा असे संदेश देत सदिच्छा दिल्या. पण मी खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यामुळे होत असलेली टिका, खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणे हे चुकीची आहे. कोरोनाचा संसर्ग लवकर लक्षात येत नाही, मी आजाराला तोंड देऊन बाहेर पडलो. कोरोनाच्या आजाराकडे सहजपणे बघू नये, घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावा, शक्यतो गर्दीत जाणे टाळा, असे आवाहनही अशोक चव्हाण यांनी केले