केंद्रात कॅबिनेट , राज्यात मंत्रीपद , विधानसभेत जागा , महामंडळामध्ये वाटा , रामदास आठवलेंनी फडणवीसांकडे काय काय मागितलं…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर रामदास आठवलेंनी महायुतीकडील मागण्यांची यादीच वाचून दाखवली आहे.
केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद,विधानसभेत जागा, महामंडळांमध्ये वाटा आणि इतर सत्तापदांमध्ये वाटा मिळावा, असं रामदास आठवले म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, लोकसभेची जागा नाही तर केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद आणि विधानसभेत जागा, महामंडळे आणि इतर सत्तापदांमध्ये वाटा मिळावा. आम्ही एनडीए सोबतच आहोत, ईशान्य मुंबईची जागा जिंकू शकलू असतो. रिपाईच्या अडचणी दूर करण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दोन मित्रपक्ष आल्याने आमची अडचण झाली
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, दोन मित्रपक्ष आल्याने आमची अडचण झाली आहे. आम्हाला जागांवर पाणी सोडावं लागलं तरी आम्ही पाणी अडवणारे लोक आहोत. पाणी वाहून जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. शिर्डीची जागा मिळायला हवी होती, मिळाली नाही, पण शिर्डीपेक्षा महाराष्ट्रातून 45 जागा निवडून आणणं आवश्यक आहे. एकनाथ शिंदे अजित पवारांचे अभिनंदन ते मोठी रिस्क घेऊन आमच्यासोबत आले आहेत.
देवेंद्र फडणवीस हुशार राजकारणी झालेत
आठवले म्हणाले , पवारांना धक्का देऊन अजितदादा आले, उद्धव ठाकरेंना धक्का देऊन शिंदे आले. केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळालं तर बहुजन समाज समाधानी राहिल. मोदींच्या नेतृत्वात देश जिंकायचा आहे, आपली ताकद आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. आमची नाराजी दूर झाली, दिलेला शब्द पाळतील असं वाटतंय. जानकर आमचे मित्र, त्यांचं अभिनंदन, मी प्रचाराला जाणार आहे. ते पवारांना भेटून आले, जानकर तिकडं जाऊ नयेत म्हणून फडणवीसांनी त्यांना जागा दिली. देवेंद्र फडणवीस हुशार राजकारणी झालेत. मी पवारांकडे गेलो असतो तर मला जागा मिळाली असती, मी प्रामाणिक आहे, असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.
मी भाजपसोबत असल्याने दलित- बौद्ध मतं भाजप आणि महायुतीलाच मिळतील
भाजपविरोधात अनेक आघाड्या आहेत, त्यांना पिछाडीवर टाकण्याची आमच्यात ताकद आहे. प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीने अपमान केला. दिलेला शब्द पाळला नाही, शिवसेनेने जागा दिल्या नाहीत. त्यांनी स्वबळावर लढावं. ते भाजपविरोधात लढले तरी मी भाजपसोबत असल्याने दलित- बौद्ध मतं भाजप आणि महायुतीलाच मिळतील हे नक्की, त्यांनी त्यांचा प्रयत्न करावा, असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.