सरपंचांना ५० लाखांचे विमा कवच; सहकार मंत्री बाळासाहेब पाटीलांच्या प्रयत्नांना यश
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर कार्यरत असलेल्या ग्रामसमितीचा अध्यक्ष म्हणून सरपंचावर मोठी जबाबदार आहे. लोकांशी त्यांचा थेट संपर्क येत असल्याने त्यांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांना ५० लाखांचे विमा कवच देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. सरपंच परिषदेने याबाबतची मागणी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. आज मंत्री पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्तीमध्ये गावपातळीवर ग्रामसमित्या स्थापन केल्या आहेत. शासनाने दिलेल्या सूचना लोकांपर्यंत पोहचवणे. परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांना नियमांची अंमलबजावणी करत विलगीकरण कक्षात दाखल करण्याचे काम या ग्रामसमित्या करत आहेतत्यामुळे ग्रामसमितीचे अध्यक्ष असलेल्या सरपंचांवर मोठी जबाबदारी आहे.
त्यामुळे लोक त्यांच्या थेट संपर्कात येत असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच परिषदेने राज्यातील सरपंचांना विमा संरक्षण मिळावे यासाठी सहकार व पणन तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेऊन कॅबिनेट बैठकीत याविषयी चर्चा घडवून आणत याबद्दल आग्रही मागणी केली.
त्यामुळे राज्यातील सर्व सरपंचांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. या विमा कवचाचा फायदा राज्यातील २७ हजार ५०० सरपंचांना मिळणार आहे. प्रत्येक गावातील सरपंचाचा ५० लाख रुपयांचा विमा या माध्यमातून निघणार आहे. ग्रामीण भागामध्ये सरपंच हे सध्याच्या कोरोनाच्या लढाईत अत्यंत उत्कृष्ट काम करीत आहेत.
ते आपल्या जीवाची पर्वा न करता कृती समिती अध्यक्ष म्हणून गावातील नागरिकांची काळजी आणि सुरक्षितता जपत आहे. त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे असे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सरपंचांच्या विमा कवचाबद्दल मुख्य सचिव अजोय मेहता हे सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश देणार आहेत.