‘त्या ‘ महिलेच्या संपर्कातील १६ जण पॉझीटीव्ह ; प्रशासनात खळबळ
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
प्रशांत भागवत(९४२२८६७७४८)
उमरखेड :
तालूक्यातील नागापुर ( प ) येथील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या विलगीकरण कक्षातील १६ जणांचे रिपोर्ट मंगळवारी सकाळी पॉझीटीव्ह आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे .
दरम्यान पॉझीटीव्ह निघालेल्या या १६ जणांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे आयसोलेशन वार्डात पाठविण्यात आले आहे . तसेच यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे .
नागापुर येथील कोरोना बाधीत महिलेचा शनिवारी ( दि. ३० ) जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना मत्यू झाला होता . ही महिला १९ मे रोजी आपल्या नवरा,मुले व नातेवाईकांसह मुंबई ( जोगेश्वरी ) येथून आली होती . त्यांना गावाच्या शाळेत संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते . परंतु विलगीकरणात असतांनाही सदर महिलेने गावातील आपल्या ईतर नातलगाच्या घरी व बाहेरगावी लग्न समारंभा ठिकाणी गेली होती. दरम्यान तीला श्वसनाचा त्रास होवु लागल्याने तीने उमरखेडच्या खासगी रुग्णालयात प्राथमीक उपचार घेतले .परंतू आजार वाढल्याने पुसद येथे उपचारासाठी गेली असता तेथील डॉक्टरांना तीच्यात कोरोनाचे लक्षण दिसून आले त्यामुळे तीला यवतमाळ येथे भरती केले . तिथे तिचा मत्यु झाला. या दरम्यान तीच्यासोबत विलगीकरण कक्षात असलेल्या २७ जणासह इतर ४५ असे एकुण ७२ जणांना मरसुळ येथील कोवीड केअर सेंटर येथे ठेवण्यात आले . यामध्ये उमरखेड येथील खासगी डॉक्टर व त्यांच्या तिन कंम्पाऊंडरांचा समावेश होता . या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते . त्यापैकी आज ( दि. २ ) रोजी सकाळी १६ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आला . त्यामुळे त्यांना यवतमाळ येथे भरती करण्यात आले आहे . तर, खासगी डॉक्टर व त्यांच्या कंम्पाऊंडरांचा अहवाल निगेटीव आल्याने त्यांना ‘सेल्फ होम क्वारंटाईन’ करण्यात आले .
नागापुर सारख्या छोटया गावात तब्बल १६ जण कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने तालूक्यात खळबळ उडाली असून अनेक गावामध्ये मुंबई , पुणे , आंध्र प्रदेशातून हजारों मजुर परतले आहेत. त्यामुळे विलगीकरण कक्षामध्ये त्यांची योग्य ती काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे .
अन्, भिती खरी ठरली! नागपुरात विलगीकरण कक्षात ठेवलेल्या गावकऱ्यांचा सर्वत्र वावर सुरू आहे. त्यांच्यावर स्थानिक गाव समितीचे कुठलेही नियंत्रण नाही. लॉक डाऊन च्या काळात येथे आपत्ती व्यवस्थापन नियमांचे कुठलेही पालन होत नाही. त्यामुळे गावात कोरोना चा संसर्ग वाढण्याची भीती प्रशासनाला माजी सरपंच यांनी दोन मे रोजी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली होती. आता येथे विलगीकरण कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला व तिच्या संपर्कात आलेले तब्बल १६ जण पॉझिटिव निघाल्याने ही भीती खरी ठरली आहे. आतातरी प्रशासन गावोगावी आलेल्या व गावांच्या शाळांमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या हजारो मजुरांची योग्य ती उपयोजनात्मक काळजी घेऊन करुणा प्रतिबंध करण्याच्या हालचालींना वेग देईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे
नागापुर येथील १६ जण कोरोना बाधीत आढळल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासन घेत असून नागरीकांनी प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे .
स्वप्नील कापडणिस
उपविभागीय अधिकारी , उमरखेड