पुन्हा एक संकट ; निसर्ग चक्रीवादळ: मुंबई, नवी मुंबईत पावसाला सुरुवात
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरोना चे तांडव चालू असतानाच आता निसर्ग चक्रीवादळ गेल्या सहा तासांत ताशी 13 किलोमीटर वेगाने पुढे सरकलंय आणि ते पुढील 12 तासांत अधिक तीव्र असं त्याचं ‘सिव्हिअर सायक्लोफनिक स्टॉर्म’चं रूप धारण करू शकतं असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये हे वादळ अलिबाग भागात धडकणार असल्याचं सांगितलं.
चक्रीवादळ कुठे आदळणार?
निसर्ग चक्रीवादळ हरिहरेश्वर आणि दमणच्या मधून जाईल असा अंदाज पहिल्यापासूनच वर्तवला जात होता. हवामान विभागाने हे वादळ 3 जूनच्या दुपारी अलिबागजवळ जमिनीवर धडकेल असा अंदाज आता वर्तवला आहे.निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चक्रीवादळाचा मार्ग काय?
3 जूनच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर पोहचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतर हे वादळ दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल.
पालघरचे उपजिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं, “आम्हाला सांगण्यात आलंय की पालघरमध्ये लँडफॉल होईल. आम्ही तयारी केली आहे. NDRFच्या तुकड्याही इथे आल्या आहेत.”यामुळे महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. तर या वादळामुळे झाडे पडणे, भूस्खलन, जोरदार पाऊस येण्याची शक्यता असून यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.
समुद्राला उधाण आल्यामुळे मुंबई, ठाणे तसंच रायगड जिल्ह्यातल्या सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं तसंच रत्नागिरी जिल्ह्यातली अशीच परिस्थिती उद्भवू शकते असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
■घराबाहेर असलेल्या मोकळ्या वस्तू अन्यत्र ठिकाणी हलवा.
■महत्त्वाचे दस्ताऐवज प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा.
■बॅटरीवर चालणाऱ्या आणि राखीव पॉवरच्या यंत्रांची नियमित परीक्षण करा.
■दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या बातम्यांकडे, सूचनांकडे लक्ष ठेवा.
■आपात्कालीन उपयोगी वस्तूंची किट बॅग तयार ठेवा.
■मोठं छप्पर असलेल्या जागा टाळा. डोकं आणि मानेच्या संरक्षणासाठी हातांचा उपयोग करा.
■विद्युत उपकरणं तपासा.
■पिण्याचे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवून ठेवा.
मुंबईतील सखल भागातील झोपडपट्टीवासीयांना स्थलांतरीत करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणु उर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे.