भाजपचे लोक सत्तेसाठी हपापलेले माजी मुख्यमंत्री : पृथ्वीराज चव्हाण
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थिर असून चांगले काम करत आहे. राज्यात भाजपचे काही लोक आजच्या कठीण काळातही राजकारण करत आहेत. काहीही करून त्यांना सत्ता मिळवायची असून सत्तेसाठी ते हपापलेले आहेत. मात्र, त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा दावा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून अर्थव्यवस्थेचे भले होणार नाही, असे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची कराडमधील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली.यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या धोरणावरही जोरदार टीका केली. केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. प्रत्यक्षात यात लोकांना कर्ज घ्या, असेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सूचित केले आहे. त्यामुळे आपल्यासह देशाचा भ्रमनिरास झाला आहे.
वास्तविक अमेरिका, इंग्लंड, जर्मनी यासारखे देश शेतकरी, मजुरांसह कामगारांच्या खात्यावर थेट पैसे पाठवत आहे. आपल्या सरकारनेही तसेच करणे अपेक्षित होते. आज लोकांकडे पैसाच नाही. देशातील बाजारपेठा ओस पडल्या आहेत. मागणी आणि पुरवठा हे सूत्रच बिघडले आहे. त्यामुळे प्रसंगी कर्ज काढून सरकारने शेतकर्यांसह कामगारांच्या खात्यावर थेट पैसे भरणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याने देशात आराजकता माजेल, अशी शक्यता व्यक्तकरत यास केंद्र सरकारच जबाबदार असेल, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलताना कोरोनासारख्या कठीण काळात राज्य शासनाला पाठिंबा देण्याऐवजी काहीजण राजकारण करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भाजपचे काही लोक आंदोलन करत आहेत. राज्यपालांच्या भूमिकेबाबत आमच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. विधानपरिषद निवडणुकीवेळी काय झाले? हे सर्वांना माहिती आहे. आता राष्ट्रपती राजवटीबाबत भाजपकडूनच बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीही नाही. राज्य शासन अस्थिर आहे, असे काहीजण भासवत आहेत. मात्र सत्तेसाठी हपापलेल्या भाजप नेत्यांचे काहीही करून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, असा टोला आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी लगावला.
‘त्या’ क्लिपबाबत माहिती घेत आहे…
दोन दिवसांपूर्वी एक क्लिप व्हायरल झाली. त्याद्वारे आपणास अडकवण्याचा प्रयत्न झाला. काही लोक आपणास सावध राहा, असे सांगत होते. राजकारणात असे अनेकदा होते आणि दोन दिवसांपूर्वी आपल्याबाबतही असेच घडले आहे. ती क्लिप आपली आहे अथवा नाही, हे सद्य:स्थितीत आपण सांगू शकत नाही. आपण त्याबाबत चौकशी करत आहोत, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले आहे