आम्हाला सत्तेत यायची घाई नाही : सरकार घालवणार नाही; जागं करणार`देवेंद्र फडणवीस
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महाआघाडी सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. या सरकारला पाडण्यापेक्षा त्याला कोरोनाच्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी जागं करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मोदी सरकारही हे महाआघाडी सरकार घालवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मनःस्थितीत नाही, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आम्हाला सत्तेत येण्याची घाई नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांनी या कोरोनाच्या परिस्थितीत केंद्र सरकार राज्याला मदत करत नसल्याचा आरोप या वेळी खोडून काढला. तसेच सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबाबत बोलताना ते म्हणाले की त्यांना प्रमाणपत्र मी देऊ इच्छित नाही.ते देण्याची माझी पात्रता नाही. मात्र हे सरकार गोंधळलेले दिसत आहे. आज एक निर्णय घेतला जातो आणि तो मागे घेतला जातो. सध्याच्या संकटात एक ठोस भूमिका घेणारे नेतृत्त्व राज्याला हवे आहे. निर्णय चुकला तरी चालेल पण ते घेणारे नेतृत्त्व आहे, अशी अपेक्षा त्यांनी केली.
शरद पवार यांनीही फडणवीस यांच्यावर टीका केली होती. सरकार अस्थिर करण्याचा भाजपवर त्यांनी केलेला आरोप फडवणीस यांनी फेटाळून लावला. भाजपचे नेते नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली तरी भाजपचा त्याच्याशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या निर्णय़ प्रक्रियेत काॅंग्रेस सहभागी नसल्याचे म्हणणे म्हणजे जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.राज्यपालांच्या आडून भाजप हे सरकारच्या विरोधात अस्थिर करत असल्याच्या आरोपावर फडणवीस म्हणाले की राज्यपाल हे शोभेच्या वस्तू नाहीत. त्यांना अधिकार आहेत. मुख्यमंत्री आमचे ऐकणार नसतील तर राज्यपालांकडे जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. शिवसेना आमच्यासोबत सत्तेत होती तेव्हा मंत्र्यांना सोबत घेऊन शिवसेनेचे नेते राज्यपालांना शेतकरी कर्जमाफीसाठी भेटले होते. ते भेटले तर बरोबर आणि आम्ही भेटले तर चूक, असे कसे म्हणता येईल. मुख्यमंत्री आमचे ऐकणार नसतील तर आम्हाला राज्यपालांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. मी राज्यपालांना आतापर्यंत केवळ चार वेळा भेटलो आहे. इतरही व्यक्ती भेटत असतात. मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलविल्यानंतर मी मंत्रालयात गेलो होतो. त्यामुळे आम्ही केवळ राज्यपालांनाच भेटतो, असे म्हणणे चुकीचे आहे