महागाव तहसील कार्यालयाचा कारभार वरिष्ठांच्या हाताबाहेर बाळासाहेब खैरे ला तात्काळ कारवाई ; इतरांचे प्रस्ताव मात्र गुलदस्त्यात ; रेती तस्करीत उपविभागाचे मौन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
प्रशांत भागवत,उमरखेड,(९४२२८६७७४८)
महागांव तहसील कार्यालयाचा कारभार वरिष्ठअधिकाऱ्यांच्या हाताबाहेर गेल्याचे दिसून येत आहे स्थानिक अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत असल्याच्या मौखिक तक्रारी असूनही त्यांचे कोणी ऐकत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी अक्षरशा वैतागले आहेत. काहींनी महागाव येथून इतरत्र बदली साठी प्रयत्न चालवले आहे.बदल्यांच्या मागणीमध्ये महिला कर्मचारी सुद्धा मागे राहिलेल्या नाहीत. बदली होत नसल्यामुळे अनेकांनी रजेचा मार्ग पत्करलेला आहे. कोविड मध्ये कामात हयगय केल्याच्या प्रकरणात बाळासाहेब खैरे या अव्वल कारकुनाला तात्काळ निलंबित केले आहे. ही कार्यवाही ज्या तत्परतेने दाखवण्यात आली हीच कार्यवाही अन्य कर्मचाऱ्या बाबत दाखवली असती तर समजू शकले असते, परंतु त्याहीपेक्षा किंवा तेवढाच अपराधाचा आरोप असलेले तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनी बरीच मेहरबानी दाखवलेली दिसत आहे. हा दुजाभाव कशासाठी असा सवाल तमाम कर्मचाऱ्या मधून विचारल्या जात आहे.
तहसीलदाराने दिलेल्या कारणे दाखवा नोटीसला एका लिपिका ने दिलेले उत्तर सोशल मीडियावर वायरल काय झाले आहे सध्या ते जिल्हाभर गाजत आहे. लीपिकाने वैतागून दिलेले उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्याचा अवमान करणारे असले तरी एकूणच कर्मचाऱ्यांच्या मनातील भावना त्यांनी एक प्रतीक म्हणून व्यक्त केली आहे. आठ मार्च रोजी महागाव येथील तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली होती .त्या बैठकीमध्ये सर्वांसमक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करून त्यांचे चांगलेच कान टोचले होते .व्यवस्थित काम होत नसेल तर बदलून जाण्याची तंबी दिली होती त्यानंतर तहसीलदारांनी १३ मार्च २०२० रोजी विभागीय आयुक्त अमरावती यांना वाशिम अकोला जिल्ह्यामध्ये बदली मिळावी म्हणून विनंती अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान तालुक्यांमध्ये अवैध रेती वाहतूक घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजत आहे त्याची तक्रार लोकायुक्तांकडे झालेली आहे. . या महाघोटाळ्यांची साधी विचारपूस उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावरून अद्यापही झालेली नाही. अवैध रेती गौण खनिज प्रकरणात रखडलेली वसुली यावर उपविभागीय अधिकारी ब्र शब्द काढायला तयार नाहीत .याचा कोणता अर्थ लावायचा हा सवाल कर्मचाऱ्या मधून व्यक्त केल्या जात आहे.अवैध रेती तस्करी मधून आकारण्यात आलेला कोट्यावधी रुपयाचा दंड तसाच पेंडिंग पडलेला आहे रेती तस्करीला विरोध करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचे निलंबन प्रस्तावही पाठवण्यात आले आहे काहींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहे तहसिलदार विषयी कर्मचाऱ्यांची असलेली नाराजी वरिष्ठ अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाहीत त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड ताण तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
उमरखेड उपविभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली दोनच तहसील कार्यालय असताना महागाव तहसील कार्यालयामध्ये अधिकारी-कर्मचार्यांच्या मनात निर्माण झालेली तेढ अद्याप सोडवता आलेली नाही ती आता कागदोपत्री जिल्हाभर गाजू लागली आहे .तहसील कार्यालयातील गोपनीयता चव्हाट्यावर आल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचेच ते धोतक मानले जात आहे. जिल्हा अधिकारी यांनी थेट हस्तक्षेप करून अवैध रेती तस्करी मधून बोकाळलेला भ्रष्टाचार आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली भीती स्वतः जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत अनेक कर्मचारी खाजगीमध्ये बोलून दाखवत आहेत.