राजकारणात राहून समाजकारणाची कायम नाळ जपणारा नेता : प्रकाश पाटील देवसरकर
साठाव्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख :
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड
काळ कुणासाठीही थांबत नाही आणि आयुष्यात एकदा गेलेला दिवस पुन्हा कधीही येणार नाही.मग ती व्यक्ती कुणीही का असेना आपल्याला मिळालेल्या सुंदर अशा आयुष्यामध्ये समाजाशी कायम नाळ ठेवून समाजाच्या हितासाठी चळवळ करणारे माणसे आपल्या बाजूला बोटावर मोजण्याएवढेच दिसतात. अशातच सर्वांच्या डोळ्यासमोर एक झंझावाती व्यक्तिमत्व म्हणून उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर नजरे समोर कायम येतात. आज प्रकाश पाटील देवसरकर यांचा ६० व्या वाढदिवस यानिमित्ताने त्यांच्या साठ वर्षाच्या राजकीय वाटचालीचे सिंहावलोकन!
उमरखेड तालुक्यातील कोपरा (बु) येथील सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे उपेक्षितांचे अंतरंग जाणणारे कै.विठ्ठलराव पाटील देवसरकर यांच्या अध्यात्मिक घराण्यात २२ मे १९६० रोजी प्रकाश पाटील देवसरकर यांचा जन्म झाला. कै. विठ्ठलराव पाटील देवसरकर त्या काळातील एक सदन शेतकरी आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पंचक्रोशीत परिचित होते. विठ्ठलराव पाटील देवसरकर यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून गोपिकाबई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड.
चातारी येथील शिवाजी शिक्षण संस्थेला व ब्राह्मणगाव येथील तेजमल गांधी विद्यालयाला भरीव आर्थिक मदत केली. याची फलश्रुती म्हणून त्या संस्थेच्या संचालक मंडळात त्यांचा समावेश होता. विठ्ठल राव पाटील यांचे सामाजिक कार्य प्रकाश पाटील देवसरकर लहानपणापासून अत्यंत जवळून पहात होते. त्यांना सामाजिक कार्याचा वारसा मिळाला. प्रकाश पाटील हे लहानपणापासून लढवय्या चळवळीत रमणाऱ्या स्वभावाचे महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी फ्रेंड्स पॅनल ची स्थापना करून कॉलेजच्या निवडणुका जिंकल्या. कॉलेजच्या निवडणुकीत राजकारणाचा श्रीगणेशा केला. गावातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन कोपरा या गावचे सरपंच म्हणून कारभार पाहिला. तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जिंकून कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरखेड तालुका खरेदी विक्री संघ, आपला जीन प्रेस, तालुका देखरेख संस्थेवर एक छत्री वर्चस्व निर्माण केले. स्थानिक स्वराज्य संस्थेत पंचायत समिती, जिल्हा परिषद नगरपालिकेत ही वर्चस्व ठेवले. स्थानिक पातळीवरचे राजकारणामध्ये ते यशस्वी ठरले परंतु राज्य पातळीवर राजकारणात काम करताना गॉड फादर असावा लागतो पण याबाबतीत प्रकाश पाटील कमनशिबी ठरले .जनता दलात असताना “गॉडफादर “म्हणुन राजाराम बापू पाटील यांचा त्यांना सहवास लाभला.राजारामबापू पाटील राज्याचे माजी मंत्री व पश्चिम महाराष्ट्रातील नेते व राज्याचे माजी मंत्री नामदार जयवंतराव पाटील यांचे वडील होते .प्रकाश पाटील देवसरकर एक दिवस आमदार होतील असे भाकीत राजारामबापू पाटील व्यक्त केले. तेव्हा प्रकाश पाटील बाराव्या वर्गात शिकत होते. हे त्यांचे भाकीत काही वर्षाने खरे ठरले. राजारामबापू पाटील यांचे अचानक निधन झाल्यानंतर गॉडफादर म्हणून त्यांची छत्रछाया हरपली अशातच सन १९९० मध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकिटावर प्रचंड बहुमताने ते निवडून आले. वयाच्या २६ व्या वर्षी सभागृहातील कमी वयाचे अभ्यासू आमदार म्हणून त्यांची नोंद झाली. मतदारसंघातील प्रश्न पोटतिडकीने मांडून नावलौकिक मिळवला. मतदार संघातील अनेक विकासकामांना चालना दिली. जनता दलात आमदार म्हणून काम करीत असताना राज्य नेतृत्वात सुंदोपसुंदी निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर पक्षाची पडझड झाल्याने जनता दलाची वाताहात झाली. त्यामुळे नाईलाजाने जनता दलातील ९ आमदारांनी जनता दलाला राम राम ठोकला यात प्रकाश पाटील यांचा समावेश होता. या सर्वांनी शरद पवार यांच्यावर विश्वास टाकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.पवार साहेबांनी काँग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस या नविन पक्षाची स्थापना केली. तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील सर्वप्रथम त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय प्रकाश पाटील यांनी घेतला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही त्यांना उपेक्षला सामोरे जावे लागले.येथही त्यांची अपेक्षेने पाठ सोडली नाही.
शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी ज्ञान प्रकाश शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन उघडले. तालुक्यातील देवसरी साखरा, सुकळी, जेवली, सावळेश्वर, बेलखेड, बाळदी ठिकाणी त्यांनी शाळा उघडल्या. बंदीभागातील अत्यंत दुर्मिळ अशा गावात राजारामबापू पाटील विद्यालय सुरू करून गोर गरिबाचे शेकडो मुले डॉक्टर इंजिनिअर प्रशासन सेवेतील अधिकारपदी पोहोचविण्याचे श्रेय प्रकाश पाटील यांना जाते.
प्रकाश पाटील यांच्या आमदारकीच्या काळात जिल्हा परिषद सदस्य असलेले विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख नामदार सुनील तटकरे ही मंडळी कॅबिनेट पदापर्यंत पोहोचले तेवढ्याच ताकदीचा हा नेता गॉड फादर नसल्याने उपेक्षित राहिला. प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह आमदार म्हणून शपथ घेतलेल्या अजित दादा पवार, आर आर पाटील, बबनराव पाचपुते ही मंडळी मंत्री पदापर्यंत पोहोचले. परंतु प्रकाश पाटील मंत्री झाले असते तर दुसरे सत्ताकेंद्र निर्माण झाले असते म्हणून त्यांना सोयिस्कररित्या डावलण्यातआले.
प्रकाश पाटील देवसरकर यांची राजकीय हितशत्रूनी उपेक्षा केली असली तरी डगमगले नाही. व त्यांनी स्वबळावर जनतेच्या आशीर्वादाने ‘एकला चलो रे’ची भावना ठेवून राजकीय वाटचाल सुरू ठेवली. वसंत सहकारी साखर कारखाना निवडणुकीत २३ पैकी २३ संचालक निवडून आणून मातब्बर नेत्यांना त्यांची जागा दाखवली व १३ वर्ष चेअरमन म्हणून काम पाहिले. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त उसाला भाव मिळवून दिला पण तेथेही त्यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी त्यांच्या हितशत्रूंनी बदनाम करण्याचे षडयंत्र रचले व त्यात काही प्रमाणात यशस्वी झाले .पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की, कारखान्यासाठी पूर्वहंगामी कर्ज ऑक्टोबर मध्ये न देता जिल्हा बँकेकडून मीटिंग डिसेंबर मध्ये घेऊन जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात कर्ज पुरवठा करण्यात आला. पैश्याअभावी कारखान्याची यंत्रणा हजर होऊ शकत नाही .अशी कारखानदारीतील फार मोठी अडचण असते वसंत कारखान्यासमोर अशा अनेक अडचणी उभ्या ठाकल्या या अडचणीवर मात करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. परिणामी कारखाना डबघाईला आणण्याचे खापर प्रकाश पाटील यांच्यावर फोडून हितशत्रू नामानिराळे राहिले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी देऊ असे आश्वासन देऊनही वेळेवर तिकीट नाकारणे येथे उपेक्षा पदरी पडल्यामुळे त्यांनी काँग्रेसची वाट धरली. शिवसेनेने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली असती तर त्यांचा निश्चित विजय झाला असता त्यांना उमेदवारी न दिल्याने हा मतदारसंघ एका अनुभवी व कार्यक्षम नेत्याला मुकला हे वास्तव नाकारून चालणार नाही.
‘पद असो वा नसो’ त्यांची जनतेसाठी सातत्याने धडपडत चाललेली असते. उमरखेडला राहणाऱ्यां पैकी फक्त प्रकाश पाटील रात्रीबेरात्री जनतेच्या अडचणी साठी धावून जातात. केव्हाही फोन केला तर जनतेसाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती विरोधकही मान्य करतात. ह्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठेपणा दिसून येतो. उमरखेड तालुक्यातील ढाणकी ,ब्राह्मणगाव, मुळावा उमरखेड या ठिकाणी जिजाऊ नागरी सहकारी बँक स्थापन करून बेरोजगार युवकांना कर्जपुरवठा करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य तर केलेच शिवाय त्यांना उद्योगधंदे करण्यासाठी मार्गदर्शन केले. जिजाऊ बँकेच्या यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शाखा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
प्रकाश पाटील देवसरकर हे गेल्या १५ वर्षापासून यवतमाळ जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या बँकेच्या निवडणुकीत उमरखेड तालुक्यातील ५१ विविध कार्यकारी संस्थेचे पैकी एकेचाळीस प्रतिनिधी त्यांच्यासोबत होते आणि याची दखल घेत जिल्ह्यातील माणिकराव ठाकरे ,शिवाजीराव मोघे मनोहरराव नाईक यासारख्या दिग्गज नेत्यांनी जिल्हा बँकेवर त्यांची अविरोध निवड केली .सातत्याने लोकांच्या संपर्कात असणाऱ्या लोकनेत्याला भविष्यात बँकेचे अध्यक्ष म्हणून संधी दिली तर त्यांचा राजकीय अनुभवाचा जिल्ह्यातील सहकारी संस्थांना, कास्तकारांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद प्रकाश पाटील देवसरकर यांना पक्षश्रेष्ठी ने दिल्यास खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळेल व आमच्यासारख्या तमाम हितचिंतकाना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. पक्षश्रेष्ठींकडून एवढीच माफक अपेक्षा आहे ती पूर्ण होहो. प्रकाश पाटील देवसरकर नावाचा झंझावात आज ६० वर्षाचा झाला यावर विश्वास बसत नाही. उमरखेड मतदारसंघातील राजकीय क्षितिजावरील तळपता तारा नव्या उभारीने, नव्या जोमाने पुढे येईल आणि जनतेच्या अडचणी, समस्या प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
शुभेच्छुक :
साहेब आपण ६१ व्या वर्षात पदार्पण करीत असताना आपले राजकीय-सामाजिक दिवस भरभराटीचे जावो. आपणास उदंड आयुष्य लाभो .आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
एक शुभ हितचिंतक
भीमराव पाटील चंद्रवंशी
माजी जिल्हा परिषद सदस्य