एखादं पत्र उद्धव ठाकरेंनाही लिहा : देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना ‘सल्ला’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाहीये. राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरु आहे. पवार पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहितात. त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं,” असा सल्ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेऊन निवदेन सादर केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ”केंद्राने परराज्यात पाठवल्या जाणाऱ्या नागरिकांच्या तिकिटाचे ८५ टक्के पैसे दिले, राज्याने १५ टक्के द्यायचे होते.मात्र महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेचा खर्च किती येतो हेच माहित नाही, त्यामुळे आम्ही ‘महाराष्ट्र बचाव’ ही भाजपची भूमिका घेऊन राज्यपालांना निवेदन दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात असे सांगून फडणवीस म्हणाले, ” अनेकांना उपचार मिळत नाहीत. एकीकडे ही अवस्था आहे तर दुसरीकडे शेतमाल पडून आहे, त्याची व्यवस्था राज्य सरकारने केलेली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाहीत अशी स्थिती आहे. शेतकऱ्यावर संकट आलं आहे. बारा बलुतेदारांवरही संकट कोसळलं आहे. केंद्र आणि विविध राज्यांनी पॅकेज दिलं आहे, मात्र महाराष्ट्राने दिलेले नाही, ते द्यायला हवं,”
”केंद्राने एवढं मोठं पॅकेज दिलं, तरीही यांचं केंद्राकडे बोट, ते राजकारण नाही आणि आम्ही सूचना मांडल्या की आमचं राजकारण कसं? सामान्य माणसाला रेशन मिळत नाही, घोटाळे सुरु आहेत, केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही, त्यांनाही देण्याच्या सूचना दिल्या आहेत, पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच धान्य मिळत नाही. रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही. त्याअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत,” अशी टिका फडणवीस यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “आता हे उघड्या डोळ्याने पाहणे शक्य नाही. आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहे, आमची मदत नको असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्यात. राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करु, त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही पाठिशी उभं राहू. मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली, आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहे, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको,”
पायी जाणाऱ्या मजुरांना थांबवा या सूचना केल्या होत्या, मात्र जातात तर जाऊ द्या आपलं संकट टळतंय अशी राज्य सरकारची धारणा होती. मात्र या मजुरांना ट्रेन किंवा बसने पाठवलं जाऊ शकलं असतं, असेही फडणवीस म्हणाले. परदेशात अडकलेल्यांना भारतात परतायचं आहे, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे विमानं उतरण्यास परवानगी नाही, लोक व्हिडीओ करुन पाठवत आहेत, त्यांचे हाल होत आहेत विमाने उतरण्यास महाराष्ट्राने परवानगी द्यावी, त्यांना क्वारंटाईन करुन उपचार करता येतील, मात्र त्यासाठी निर्णयाची गरज आहे. पण निर्णय होत नाहीत,” असेही फडणवीस म्हणाले.
सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे, राज्य सरकारने पॅकेज दिलं पाहिजे, बारा बलुतेदारांचा विचार सरकारने करायलाच हवा, अन्य राज्याने केला मग आमचं सरकार कधी करणार हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.