ज्यांना मोठं केलं त्यांनीच…; शरद पवारांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली खंत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थित पुण्यात आमदार आणि खासदारांची बैठक पार पडत आहे. निसर्ग मंगल कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
ज्यांना मोठं केलं तेच आज सोडून गेलेत, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
काही लोकांनी नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या लोकांना आपण मोठं केलं तेच लोक आपल्याला सोडून गेले आहेत. ज्यांना शक्ती दिली, ज्यांच्यासाठी कष्ट केले ते आज शक्तीशाली झाले आहेत, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.
जे घडलं त्याची चिंता करु नका, नवीन लोकांना संधी देऊ. सोडून गेलेल्यांबाबत विचार करण्याची गरज नाही. एक मोठी संधी तुम्हाला मिळाली आहे.सामान्य लोकांच्यामध्ये जाऊन भूमिका मांडून त्यांचा पाठिंबा मिळवणारे विजयी होत असतात. नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जेव्हा निवडणुका पार पडतील, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्यांची एक फळी तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामान्म माणसाचा पाठिंबा आवश्यक असतो. आपण पक्ष उभा केलाय हाच इतिहास आहे. सत्ता येते, सत्ता जाते. ती कधीच कायमस्वरुपी नसते.ज्यांनी पक्ष फोडला. ते पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यांना लक्ष्यात येतंय की उद्या आपल्याला लोकांमध्ये जायचं आहे. लोक तेव्हा प्रश्न विचारतील. त्यामुळे त्यांनी आपल्यावर टीका सुरु केली आहे. पण, काळजी करण्याची गरज नाही. सामान्य लोक आपल्यासोबत आहेत, असंही ते म्हणाले.
माणूस विचार करतो, तुम्ही कोणाच्या तिकीटावर निवडून आला? कोणाच्या नेतृत्वात तुम्ही निवडून आला? कोणत्या चिन्हावर तुम्ही निवडून आला हे मतदारांना माहिती आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला लागा असं पवार म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक आठ-दहा महिन्यावर आली आहे. आपण ठरवलेल्या सर्व मतदारसंघातील जागा जिंकणारच असा विचार करुन पाऊलं टाकली पाहिजेत. आपण विचाराशी बांधिल आहोत. संधीसाधू नाही हे सांगण्याचं ऐतिहासिक काम तुम्ही करत आहात. त्याबाबत तुमचं मी अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी कार्यकर्त्यांसमोर दिली.