चौथ्यांदा वाढलं लॉकडाऊन तेलंगाना सरकारचा २९ मेपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
तेलंगणामध्ये चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आले असून २९ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी याची घोषणा केली आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय असताना तेलंगणाने हा मोठा निर्णय घेतला आहे. देशातील तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत लागू असणार आहे. परंतु, त्यानंतरही २९ मेपर्यंत लॉकडाऊन वाढणार असल्याचे तेलंगणा सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तेलंगणा चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवणारं पहिलं राज्य ठरलं आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी म्हटले की, ‘तेलंगणामध्ये कोरोनाचे १०९६ रुग्ण आढळून आले आहेत.ज्यापैकी ६२८ जण बरे झाले आहेत. मंगळवारी राज्यात कोरोनाचे ११ नवे रुग्ण वाढले. सध्या तेलंगणामध्ये कोरोनाच्या ४३९ रुग्ण उपचार घेत आहेत.’नागरिकांनी ६ वाजेपर्यंत आवश्यक वस्तू खरेदी करुन पुन्हा घरात गेलं पाहिजे. संध्याकाळी ७ नंतर राज्यात कर्फ्यू असेल. जर कोणी बाहेर फिरताना आढळलं तर त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचेही चंद्रशेखर राव यांनी सांगितले. केंद्र सरकार लॉकडाऊन वाढवणार की नाही यावर निर्णय होण्याच्या आधीच केसीआर सरकारने तेलंगणामध्ये लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.