‘त्या’ तीन नगरसेवकांशी आमचा काहीही संबंध नाही, वंचितने केला खुलासा…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- अकोला जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत असलेल्या बार्शीटाकळी येथील नगरपंचायतीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आणि अपक्ष सदस्यांनी बार्शीटाकळी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे.
यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजपचे मूर्तीजापूरचे आमदार हरीष पिंपळे यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. याशिवाय भाजपने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या नगरसेवकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक नाहीत, असा खुलासा वंचितने एका पत्रातून केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पंचायत समितीच्या आवारामध्ये बसवण्यात यावा, या विचाराचे वंचित बहुजन आघाडी समर्थन करते. कारण छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचार प्रणालीवर चालणार आमचा पक्ष आहे, असे वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलींद इंगळे यांनी पत्रात म्हटले आहे. महाराजांच्या पुतळ्याला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
वंचितने जारी केलेल्या पत्रानुसार, २२ फेब्रुवारी २०२२ रोजी वंचित बहुजन आघाडीचे पंचायत समिती सदस्य दादाराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पंचायत समिती बार्शीटाकळीच्या आवारात बसवावा, असा ठराव मांडला होता. हो ठराव तत्कालीन सभापती आणि वंचितचे नेते प्रकाश वाहूरवाघ बहुमताने मंजूर करून घेतला होता. ही वस्तुस्थिती आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा खोटा..
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या नऊ नगरसेवकांमध्ये वंचितचे तीन नगरसेवक असल्याचा खोटा दावा केला. वंचित बहुजन आघाडीकडून त्यावेळी निवडून आलेले ते तिन्ही नगरसेवक यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीला सोडून गेले आहेत. आता त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. त्यांनी स्वतंत्रपणे घेतलेला तो निर्णय आहे. त्यांच्या निर्णयाशी वंचितचा कुठलाही संबंध नाही.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि त्यांच्या पक्षाने शिवाजी महाराजांबद्दल (Chhaatrapati Shivaji Maharaj) खोटे प्रेम दाखवू नये. हे करण्याआधी त्यांनी भाजपची (BJP) विचारधारा सोडून छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेसोबत जुळावे. उगाच जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला बदनाम करू नये, असेही वंचितने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.