देशात १२ हजार किलोमीटरचे नवे ‘ग्रीन हायवे’ :- गडकरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- संपूर्ण देश रस्त्यांनी जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या तीन-चार वर्षांत देशात सुमारे १२ हजार किलोमीटरचे नवे ‘ग्रीन हायवे’ बांधण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी “पॉलिटिक्स स्पेशल” च्या विशेष प्रतिनिधीला दिली.
कोणत्याही प्रदेशाच्या किंवा देशाच्या विकासासाठी रस्ते हे रक्तवाहिन्यांप्रमाणे काम करीत असतात. ते विकासाचे मार्ग असतात. यापुढे रस्ते उभारताना ते पर्यावरणपूरक करण्याकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे. नवे महामार्ग हे अत्यल्प प्रदूषण निर्माण करणारे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, सर्वत्र पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन ही कनेक्टिव्हिटी, जिल्हास्तरावर आणि मागास भागांना कनेक्टिव्हिटी वाढविली जाईल. त्यातून रोजगार निर्माण होईल. शिवाय पर्यटनाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धीचा मार्गही मोकळा होणार आहे. सध्या दिल्ली ते मद्रास, दिल्ली ते त्रिवेंद्रम, दिल्ली ते हैदराबाद, दिल्ली ते बंगळुरू ही सर्व उत्तरेतून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक ही मुंबई-पुण्याहून जात होती. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. त्यासाठी सुरतला एक ग्रीन एक्स्प्रेस हायवे तयार केला जात आहे. त्यामुळे उत्तरेतून राजस्थान, गुजरात इकडे जाणारी वाहतूक सुरतहून नाशिक, अहमदनगर आणि सोलापूरहून दक्षिणेत जाईल.
गडकरी यांनी श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंतच्या रस्त्यांच्या जाळ्यांबाबत विस्ताराने सांगितले. ते म्हणाले की, जोजिला टनेलमध्ये आपण पाच हजार कोटी रुपये वाचविले. ही टनेल आशियातील सर्वांत मोठी १४.५ कि.मी.ची टनेल आहे. या टनेलमधून झिडमोर ही कारगिलच्या खाली आहे. या टनेलच्या येथून बाबा अमरनाथ दहा किलोमीटरवर आहे. टनेल ते अमरनाथ रोप वे तयार करायचा आणि कारगिलच्या वरती हिल स्टेशन तयार करायचे. डावोससारखे पर्यटनस्थळ साकारू शकते. झिडमोर टनेलवरून श्रीनगरला येऊ आणि श्रीनगरला आल्याबरोबर हा जो दिल्ली-अमृतसर-कटरा हायवे आहे तो मध्ये मिळेल जम्मू-श्रीनगर रस्त्याला मिळेल. तेथून आपण आठ तासात श्रीनगरहून दिल्ली, सहा तासांत दिल्ली-कटरा, दिल्ली-अमृतसर चार तासांत, अमृतसरहून दिल्लीला आणि दिल्लीला आल्यानंतर तो दिल्ली-मुंबई हायवेला लागेल. म्हणजे बारा तासांत मुंबई. मुंबईहून पुढे सुरतपासून वळला की दक्षिणेत जाईल. खऱ्या अर्थाने काश्मीर ते कन्याकुमारी असा हा एक हायवे होईल.
हायड्रोजन इंधनावर धावणार कार
पेट्रोल, डिझेलच्या इंधनाला मर्यादा आहेत. यापुढे सांडपाणी आणि सौरऊर्जेच्या वापराने तयार केले जाणारे हायड्रोजन इंधन हेच भविष्य आहे. देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मोठ्या प्रमाणात सांडपाणी उपलब्ध असते. घनकचरा व्यवस्थआपन आणि सौरऊर्जेच्या संयोगातून हायड्रोजनचे इलेक्ट्रोलायझर तयार करता येतात. बेंगळुरूमधील एक स्टार्टअप कंपनी मोठ्या प्रमाणात याची निर्यात करते. पर्यावरणाच्यादृष्टीने आपण याचा वापर केल्यास ते किफायतशीर आणि पर्यावरणपुरक असे दोन्ही उद्देश साध्य करणारे आहे. येत्या दोन वर्षांत हायड्रोजनवर धावणारी वाहने आपल्याकडे येतील. हायब्रीड फ्लेक्स इंजिन आता आले आहे. त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले तर येत्या दोन-तीन वर्षांत पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या किमतीएवढ्या किमतीत ही पर्यावरण पुरक वाहने उपलब्ध होतील, अशा शब्दात गडकरी यांनी भविष्यातील वाहतूक क्षेत्रातील बदलांची नांदी सांगितली.
धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन
बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री पूर्वी सहा महिनेच आपण जाऊ शकत होतो. आता वर्षभर जाता येईल. टूरिझम वाढेल. महाराष्ट्रातील सर्व तीर्थस्थाने जोडली. पंढरपूर ते देहू-आळंदीला जोडण्याचे काम सुरू आहे. १२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पावर काम सुरू आहे. शिवाय तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, माहूर, रामटेक, प्रतिपंढरपूर धापेवाडा, आदासा, सिंगल लेन होता तेथे फोर लेन झाला. बुटीबोरी, वर्धा, यवतमाळ, नांदेड, तुळाजापूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि पुढे रत्नागिरीपर्यंत हा रस्ता जाईल.