राज्यात पर्यटन विकासासाठी आदित्य ठाकरे यांनी पाठवला प्रस्ताव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पर्यटन विकासात राज्य सरकारला साह्य करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची तज्ञ समिती व सरकारी अधिकारी यांच्यात सविस्तर चर्चेअंती आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव चेंबरतर्फे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आला आहे.
नुकतेच चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी यासंदर्भातील तपशीलवार निवेदन ठाकरे यांना दिले.
त्यांचा हा प्रस्ताव ठाकरे यांनी स्वीकारला असून लौकरच यासंदर्भात सविस्तर चर्चा होईल, अशी माहिती गांधी यांनी दिली. जगभरात अनेक ठिकाणी पर्यटन विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातात. जगात पर्यटनाचे 17 गट (बिझनेस टुरीझम, वाईल्डलाईफ टुरीझम, मेडिकल टुरीझम इ.) तयार करण्यात आले आहेत.
राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये या प्रकारांना अनुकूल असे वातावरण आहे, तेथे तशा प्रकारच्या पर्यटनाला प्रोत्साहन द्यावे. सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, राज्यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर येथे मोठी औद्योगिक केंद्रे आहेत. याचा फायदा घेऊन आपल्याला औद्योगिक पर्यटनात मोठी मजल मारता येईल. त्यासाठी मोठी कन्व्हेन्शन सेंटर उभारून कॉन्फरन्स, मिटिंग, प्रदर्शने यासाठी येणाऱ्या उद्योजकांना पर्यटनासाठी सवलती, माहिती, प्रोत्साहन देणे या बाबी करता येतील. बिझनेस टुरीझम हा जगात मोठी अर्थप्राप्ती करून देणारा व्यवसाय असून या प्रकारात महाराष्ट्र मागे पडला आहे. मात्र या प्रकारचे पर्यटनक्षेत्र राज्यात विकसित करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर जबाबदारी घेऊ शकेल, असेही आश्वासन गांधी यांनी ठाकरे यांना दिले.
अॅडव्हेंचर टुरीझम, तीर्थयात्रा, खाद्यजत्रा, फिल्म टुरीझम, शैक्षणिक टुरीझम, ग्रामीण पर्यटन, क्रूझ टूरीझम, स्पेस टुरीझम अशा वेगवेगळ्या प्रकारात जगभर वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनावर लक्ष केंद्रित केले जाते. सरकारने राज्यात यात्रेसाठी अष्टविनायक सर्किट किंवा उद्योग पर्यटनासाठी मुंबई-नवीमुंबई-पुणे-नाशिक अशी सर्किट विकसित करावीत. ऐतिहासिक किल्ले, पुणे-औरंगाबाद-सातारा यासारखी ऐतिहासिक शहरे असे सर्किट तयार करता येईल. येथे पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा बनवाव्यात. चेंबरची तज्ञ पर्यटन समिती यासंदर्भातील आराखडा तयार करून तो सरकारसमोर चर्चेसाठी ठेवेल, अशी हमीदेखील चेंबरतर्फे ठाकरे यांना देण्यात आली.