सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शिष्टाई ; विधान परिषदेच्या ४ जागा बिनविरोध…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये झालेल्या शिष्टाईत चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. मात्र, दोन जागा बिनविरोध करण्याबाबत एकमत न झाल्याने या दोन जागांवर चुरशीची लढत होणार आहे. नागपूर मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस, तर अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. मुंबईच्या दोन आणि कोल्हापूर व धुळे अशा चार जागा बिनविरोध झाल्या आहेत.
या निवडणुकीपूर्वी राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे पेवच फुटले होते. त्याचवेळी ‘ईडी’च्या कारवाया, मंत्र्यांवरील आरोप, महाविकास आघाडीवर चौफेर टीका आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून दिले जाणारे प्रत्युत्तर, यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर होणार्या निवडणुका ईर्ष्येने लढल्या जाणार, अशी चर्चा होती.
मात्र, मर्यादित मतदारसंघ, विद्यमान आमदारांचा मतदारांशी थेट संपर्क आणि त्यांचा प्रभाव, यामुळे सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक प्रस्थापित उमेदवारांविरुद्ध अवघड होत असल्याचे चित्र दिसले आणि ‘ज्याच्या जागा त्याच्याकडे ठेवायच्या,’ अशा एका समान धाग्यातून बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू झाली