नागरिकांनो, जिल्ह्यातील शांतता अबाधीत राखून आर्थिक सुबत्तेवर लक्ष द्या :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे शांतता समितीच्या माध्यमातून आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 18 नोव्हेंबर : विकासाच्या मार्गावर जाण्यासाठी शेतकरी, व्यापारी यांचेसह प्रत्येक वर्गाचे वेगवेगळे असे बरेच प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर आपल्याला सर्वांना एकत्रितपणे काम करायचे असून यासाठी जिल्ह्यात शांतता अबाधीत राखण्यात यावी व आपल्या आर्थिक सुबत्तेसाठीच्या प्रश्नावर जास्तीत जास्त काम करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना केले.
पोलीस विभागाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तसेच जिल्हा शांतता समितीचे सदस्य उपस्थीत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की लोकांना गुण्यागोविंदाने नांदायचे आहे, कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रशासन दक्ष असून समाजात तेढ निर्माण करतांना कोणी आढळल्यास त्यांचेवर कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासन घेईल व समाजकंटकाला सोडण्यात येणार नाही. शांततेसाठी प्रशासन सर्वाचे सहकार्य घेत आहे, सोबतच नागरिकांकडूनही कार्यवाही अपेक्षीत आहे. संविधाने जसे आपल्याला मुलभूत अधिकार दिले तसेच मार्गदर्शक तत्वे व कर्तव्येही दिले आहे, त्याची जाणीव सर्वांनी ठेवावी. आज चांगल्या आरोग्यासाठी सर्वांनी कोरोना लसिकरण करण्याची आवश्यकता आहे, त्याकडे लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी समाजातील लहान मुले, कॉलेजमध्ये जाणारी मुले हे उद्याचे चांगले नागरिक बनावे म्हणून त्यांना घराघरातून चांगले मुल्य शिक्षण व संस्कार देण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्ह्याची शांतता अबाधीत ठेवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांचीच असल्याचेही ते म्हणाले.
बैठकीचे प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी केले. शांतता समितीचे सदस्य हे प्रशासनाचे कान नाक डोळे असून सर्वसामान्य नागरिक होरपळू नये, त्यांच्या रोजीरोटी व कामधंद्यावर परिणाम होणार नाही यासाठी प्रशासनातर्फे आपण लक्ष ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जाफर खान, राजाभाऊ पाथ्रटकर, फिरोज लाखाणी, भारत पवार, शेख युनीस, मुबारक तंवर, मो. आसिम अली, प्राचार्य विजय बाकडे, चिंतामन कदम, भिमराव कांबळे, बापूराव रंगारी, प्रा. वाकडे, सय्यद गफी, बी.जी.राठोड, संदिप राठोड, प्रा. पुरूषोत्तम पाटील, प्रा. अनिल कांबळे, डॉ. रामदास ढगे इ. जिल्हा शांतता समितीचे सदस्यांनी जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी प्रशासनाकडे आवश्यक सूचना मांडल्या.
बैठकीचे संचालन व उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक सचिन केदारे यांनी व्यक्त केले.