लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी युवा वर्गाने मतदार यादीत नाव नोंदवावे :- जिल्हाधिकारी अमोल येडगे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 9 ऑक्टोबर :- वयाची 18 वर्ष पुर्ण झालेल्या सर्व नागरिकांना भारतीय संविधानाने मतदानाचा हक्क प्रदान केला असून लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने सक्षमपणे आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. तत्पुर्वी सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी व 18 वर्षावरील युवा वर्गाने प्राधान्याने आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाही व्यवस्था बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात निवडणूक साक्षरता समितीची आढावा बैठक काल संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी येडगे बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी(निवडणूक) डॉ. स्नेहल कनीचे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी, दीपक हाते, स्कॉऊट गाईडच्या कवीता पवार, गजानन गायकवाड यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की, मतदार यादीतून नाव वगळणे, नवीन नाव नोंदविणे, नावात किंवा पत्त्यात दुरुस्ती इ. कामे नागरिकांना सोयीस्कर व्हावी यासाठी शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, स्काऊट गाईड व एन.सी.सी.च्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात शिबीरांचे आयोजन करावे तसेच नागरिकांना लोकशाहीतील मतदानाचे महत्व सांगावे. नागरिकांना व्होटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपच्या माध्यमातून तसेच एन.व्ही.एस.पी. या पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या आपले नाव व इतर माहिती टाकुन मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करता येणार आहे, तसेच निवडणूक विषयक इतर माहिती मिळणार आहे, याबाबतची माहिती सर्वांना व्हावी यासाठी माध्यमातून विशेष प्रसिद्धी करण्याचेही त्यांनी सांगितले.
उपजिलहाधिकारी (निवडणूक) स्नेहल कनिचे यांनी मतदान पुनरिक्षणाची माहिती देतांना सांगितले की भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार दि.01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला असून त्याचे वेळापत्रकानुसार दि.09 ऑगस्ट, 2021 (सोमवार) ते दि. 31 ऑक्टोंबर, 2021 (रविवार) पर्यंत दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांर्कीक त्रुटी दुर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी/पडताळणी करणे, योग्यप्रकारे विभाग/भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे इ. पुर्वपुनरिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. दि.1 नोव्हेंबर, 2021 (सोमवार) रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येईल.त्यावर दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.1 नोव्हेंबर, 2021(सोमवार) ते दि.30 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार) पर्यंत राहील. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी, यांनी निश्चित केलेले दिवशी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात येईल. दावे व हरकती दि.20 डिसेंबर, 2021(सोमवार) पर्यंत निकालात काढण्यात येतील. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि.05 जानेवारी, 2022 (बुधवार) रोजी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.