असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी ई-श्रम योजनेंतर्गत नोंदणी करावी :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 28 सप्टेंबर :- असंघटील क्षेत्रात कार्यरत कामगारांनी त्यांना सामाजिक सुरक्षा व इतर कल्याणकारी योजनानांचे लाभ मिळण्यासाठी आपली नोंदणी ई-श्रम योजनेअंतर्गत करावी तसेच लहान मोठ्या आस्थापनाचालकांनीदेखील आपल्या कामगारांना नोंदणीसाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
ई-श्रम कार्ड योजनेबाबत आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हा कामगार अधिकारी राहुल काळे, सामान्य सेवा केंद्राचे दिनेश चोपडा, सुनिल उईके, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजेंद्र निमोदीया प्रामुख्याने उपस्थित होते.
ई.-श्रम योजनेअंतर्गत नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही, आवश्यक शुल्क शासनामार्फत भरण्यात येते. कामगारांना दुर्दैवाने मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास सध्या रुपये दोन लाख मदत देण्यात येते, यात पुढे शासनातर्फे इतर अनेक लाभदायक योजनांचादेखील समावेश करण्यात येणार असल्याने कामगारांना प्रोत्साहीत करून जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी कामगार अधिकारी यांना दिले.
उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 13 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयात नमूद रोज मजूरी करणारे, रस्त्यावरील विक्रेते, दुकानात काम करणारे, आशा वर्कर, विणकर, सुतार, लोहार, शेतमजूर, मच्छमार, ऑटोचालक, विटभट्टी कामगार, घरगुती काम करणारे, वृत्तपत्र विक्रेते अशा विविध 300 प्रकारच्या विविध व्यवसायातील कामगारांची नोंदणी यात करावयाची आहे.
नोंदणीसाठी असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष 16 ते 59 वर्ष दरम्यानचा कामगार, आयकर भरणारा नसावा, तो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा साभासद नसावा व शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असावा. त्याचेकडे आधार कार्ड, बँक पासबुक, कुटूंबातील कोणाकडेही आधार लिंक असलेला सक्रीय मोबाईल क्रमांक असने आवश्यक आहे.
नोंदणी स्वत: करता येईल किंवा नागरी सुविधा केंद्र, कामगार सुविधा केंद्र, ई-श्रम पोर्टल (https://www.eshram.gov.in), नॅशनल हेल्पलाईन नंबर 14434, अथवा टोल फ्री नंबर 18001374150 यावर देखील करता येईल. नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाल्यावर कामगारास युनिव्हर्सल अकाऊंड नंबर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कामगार अधिकारी राहुल काळे यांनी बैठकीत दिली.
यावेळी दिवाकर नागपूरे, मनिष लोळगे, संजय भालेराव, पल्लवी रामटेके, ज्योती रत्नपारखी व विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.