कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स ; चुकीच्या संदेशांना बळी न पडण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 13 :- कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) निर्माण करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून महिला व बालविकास अधिकारी हे सदस्य सचिव तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
सद्यस्थितीत कोरोना विषाणुचा वाढलेला संसर्ग, बाधित व्यक्तिंचे व मृत्युचे वाढलेले प्रमाण विचारात घेता त्याचा बालकांच्या जीवनावरसुध्दा गंभीर परिणाम होत आहे. त्यातच काही प्रसंगी कोव्हीडमुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेण्यारे कोणीही नसल्यामुळे ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठीत करण्याचे निर्देश दिले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून आहेत. यात जिल्हाधिकारी हे प्रमुख म्हणून टास्क फोर्सच्या कामकाजावर संपूर्ण नियंत्रण ठेवतील. तसेच कोव्हीडमुळे दोन्ही पालक गमाविलेल्या तपशीलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितास निर्देश देणे, याव्यतिरिक्त दर पंधरा दिवसातून एकदा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येईल.
टास्क फोर्सच्या कार्यप्रणालीमध्ये चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 चा माहितीफलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावणे, अनाथ, निराश्रीत बालकांना समुपदेशन व मदत करणे, बालकांच्या दत्तक विधानाबाबत समाजमाध्यमांमध्ये चुकीचे संदेश पसरविणा-यांवर कारवाई करणे, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कार्यक्षेत्रात कार्यरत असणा-या बालगृहे / निरीक्षण गृहाकरीता स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करणे आदींचा समावेश आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांनी कळविले आहे.
बालकांच्या बाबतीत समाज माध्यमावरील चुकीच्या संदेशांना बळी पडू नका : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची मोठी सामाजिक समस्या निर्माण होत आहे. अशा बालकांना मदत करण्यासंदर्भात समाज माध्यमांद्वारे अनेक चुकीचे संदेश / गैरसमज पसरविल्या जात आहे. मात्र अशा संदेशांना कुणीही बळी पडू नये. तसेच याबाबत कोणतीही माहिती आवश्यक असल्यास चाईल्ड लाईन क्रमांक 1098 किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
०००००००