दत्तमांजरीच्या अन्यायग्रस्त कामगाराला न्याय कधी मिळणार ; चोंडी प्रकरणा वरून तरी जिल्हा पोलीस प्रशासन जागे होतील का…?
दत्तमांजरीच्या अन्यायग्रस्त कामगाराला न्याय कधी मिळणार ; चोंडी प्रकरणा वरून तरी जिल्हा पोलीस प्रशासन जागे होतील का…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- वन विभागात झालेल्या बंधाऱ्याच्या बोगस कामाची व हरीण मोराच्या हत्येची चौकशी करण्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊनही संबधीताने दखल न घेतल्याने हताश होऊन आत्मदहन करून जीवनयात्रा संपविण्याची पाळी लोहा तालुक्यातील चोंडी येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्यावर आल्याची बाब नुकतीच उघड झाली आहे.
माहूर तालुक्यात गेल्या २४ दिवसापूर्वी माहूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात वाचक पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेल्या शरद घोडके यांनी माहूर तालुक्यातील दत्तमांजरी येथील कामगार कृष्णा रोहिदास जाधव यांच्यावर अधिकार नसतांना विनाकारणच पोलीसी बळाचा वापर करत खाजगी वाहनातून माहूर पोलीस ठाण्यात नेऊन सुंदरी(चामडी पट्टा) ने मारहाण केल्याची तक्रार माहूर पोलीस स्टेशनला सादर करून निवेदनाची एक प्रत तहसीलदार माहूर यांना सादर करून आपल्यावर विनाकारण अन्याय करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांचे विरुद्ध कारवाई करून न्याय द्यावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
सदर प्रकरणात तहसील कार्यालयाकडून पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे माहूर यांना एक पत्र देऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कामगारास न्याय देण्या बाबत सुचविले व कामगार कृष्णा जाधव यास आत्मदहनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले परंतु आजमितीस २४ दिवसाचा अवधी झाला असला तरी पोलीस प्रशासनाकडून चौकशावर चौकशा करून कागदी घोडे नाचविण्यापलीकडे ठोस असे काहीही घडले नसल्याने त्या दत्तमांजरीच्या अन्यायग्रस्त कामगारास पण चोंडी येथील शिवदास संभाजी ढवळे प्रमाणे स्वतःचा जीव गमावूनच न्याय मिळवावा लागणार आहे की काय अशी चर्चा माहूर तालुक्यातील कामगार वर्गात जोरात सुरु झाली आहे.
सदर प्रकरणात सुरुवातीला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशांनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी चौकशी करून अहवाल सादर केला असतांना पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांच्या तथाकथित बनावट फिर्यादीची प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांनी चौकशी केल्याची माहिती असून प्रकरण अद्याप थंड बस्त्यात पोलीस प्रशासनाच्या लालफितीतच अडकून असल्याने तथा अन्यायग्रस्त कामगार कृष्णा जाधव यास न्याय देण्याबाबत किंवा आत्मदहनाच्या विचारापासून परावृत्त होण्या बाबत अद्याप काहीही ठोस प्रतिउत्तर न मिळाल्याने अन्यायग्रस्त कामगारास न्याय मिळणे म्हणजे दिवास्वप्नच बनले आहे.
निदान नुकत्याच घडलेल्या लोहा तालुक्यातील चोंडी प्रकरणावरून तरी माहूर पोलीस जागे होतील काय ! असा सवाल अन्यायग्रस्त कामगार कृष्णा जाधव च्या परिवार व आप्तस्वकीय व कामगार वर्गातून व्यक्त होत असून पोलीस प्रशासनाच्या “ सद रक्षणाय खल निग्रहणाय” या बोध वाक्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.