इंदू मिलवरुन राजकारण करू नये , उद्धव ठाकरेंचं आवाहन
सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंदू मिलवरील जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी सर्वांच्या सहभागानं पायाभरणी होणार असल्याचं सांगितलं आहे. यासंबंधी त्यांनी निर्देशही दिले आहेत. दरम्यान कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती त्यांनी केली आहे.
“इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
“एमएमआरडीएने राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरवल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश दिले आहेत,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. त्यामुळे कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.