ईडीची धाड, गुलाबजाम अन् चर्चांना उधाण; ‘त्या’ भेटीनं समीकरण फिरलं अन् शिंदेसेना-मनसेचं जुळलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “ठाणे जिल्ह्यात येणारी कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेसेना आणि भाजप यांच्याकडून एकमेकांना शह-काटशह दिले जात आहेत. महापालिका निवडणुकीआधी, युती जाहीर झालेली नसताना भाजपनं शिंदेसेनेचे माजी नगरसेवक गळाला लावले.
मनसेचे काही मातब्बर नगरसेवकदेखील भाजपनं आपल्याकडे घेतले. त्या सगळ्याला उत्तर म्हणून शिंदेसेना आणि मनसेनं निवडणूक निकालानंतर युती केल्याची चर्चा आहे. मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंदेखील शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यानं भाजपची गोची झाली आहे.
शिंदेसेना-भाजप यांनी कल्याण-डोंबिवलीत युती करुन निवडणूक लढवली. युतीनं १२२ पैकी १०३ जागा जिंकल्या. त्यानंतर महापौरपदासाठी संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्यात शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी बाजी मारली. मनसेसह अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवत त्यांनी बहुमताचा आकडा गाठला. शिंदेसेनेनं भाजपला त्यांच्याच प्रदेशाध्यक्षांच्या शहरात धक्का दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रविंद्र चव्हाण डोंबिवलीचे आमदार आहेत.
श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यात विस्तवदेखील जात नाही, राजू पाटील आणि रविंद्र चव्हाण यांचे उत्तम संबंध होते. पण गेल्या काही महिन्यांमधील घडामोडींनी सगळं समीकरणं बदलली. चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष होताच शिंदेसेनेच्या नगरसेवकांना भाजपमध्ये घेतलं. महेश पाटील, दिपेश म्हात्रे या शिंदेंच्या निकटवर्तीयांना आपल्याकडे घेत त्यांनी शिंदेंना शह दिला. त्यामुळे शिंदे विरुद्ध चव्हाण संघर्ष पेटला.
महेश पाटील, दिपेश म्हात्रे यांचे पक्षप्रवेश शिंदेंच्या जिव्हारी लागले. यानंतर चव्हाण यांनी मनसेकडे मोर्चा वळवला. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका सरोज भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांचेही पक्षप्रवेश चव्हाण यांनी करुन घेतले. त्यानंतर चव्हाण आणि पाटील यांचे संबंध बिघडले.
राजू पाटील आणि रविंद्र चव्हाण एकमेकांचे शेजारी आहेत. राजकारणातही त्यांनी शेजारधर्म पाळला. दोघांचे संबंध उत्तम राहिले. पण चव्हाण यांनी मनसेच्या मातब्बर नगरसेवकांना गळाला लावलं आणि मिठाचा खडा पडला. राजू पाटीलच त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये पाठवत असल्याची चर्चा रंगू लागली. त्यामुळे पाटील यांच्या प्रतिमेला काही प्रमाणात धक्का बसला.
१२ नोव्हेंबर २०२५ रोजी राजू पाटील यांचे बंधू विनोद पाटील यांच्या घरावर ईडीची धाड पडली. त्यानंतर चारच दिवसांनी म्हणजेच १६ नोव्हेंबरला राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे एका लग्नात सोबत दिसले. एकमेकांचे राजकीय वैरी असलेले दोन नेते सोबत दिसल्यानं बरीच चर्चा झाली. दोघांमध्ये काय चर्चा झाली, असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर लग्नात गुलाबजाम कसे झालेत, त्याबद्दल तर नक्कीच चर्चा झालेली नसेल, असं उत्तर राजू पाटील यांनी दिलं. चव्हाणांकडून सुरु असलेली फोडाफोड, त्यानंतर ईडीची धाड आणि मग झालेली पाटील-शिंदे भेट चर्चेत राहिली. हा सगळा घटनाक्रम लक्षवेधी ठरला.
या भेटीनंतर राजू पाटील यांनी शिंदे पितापुत्र आणि शिवसेनेला लक्ष्य करणं टाळलं. गेल्या एक ते दोन महिन्यांत त्यांनी शिंदेंना एकदाही रडारवर घेतलेलं नाही. शिंदे आणि पाटील योग्य संधीची वाट होती. अखेर महापालिका निवडणूक निकालानंतर त्यांना संधी मिळाली. ही संधी दोघांनी साधली. महापालिकेत भाजपसोबत सत्ता स्थापन करु शकतो, हा स्पष्ट इशारा शिंदे यांनी चव्हाण यांना दिला. तर कोंडी करायचा प्रयत्न केलात, तर आम्हीदेखील दुसरा पर्याय शोधू शकतो, हा संदेश पाटील यांनी चव्हाण यांना दिला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..