लातूर, नांदेड जिल्ह्यात तुफान पाऊस..! आज शाळांना सुट्टी, लष्कराला बोलावले, पुरातून 10 जणांची सुटका….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- “मराठवाड्यात काल-परवापासून नांदेड, लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून नांदेडनंतर लातूरमध्येही पूरस्थिती आहे. लातूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या दहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
तर आता लातूर-नांदेड जिल्ह्यात बचाव कार्यासाठी पुन्हा एकदा लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
अहमदपूर, शिरुर अनंतपाळ तालुक्याला पुराचा फटका
जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि अहमदपूर तालुक्यात पूरपरिस्थितीमुळे पुरात अडकलेल्या दहा जणांची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नागरिकांनी यशस्वीपणे सुटका केली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करत पथकाने ही बचाव कार्ये यशस्वीरीत्या पूर्ण केली. खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय सैन्याचे एक पथक लातूरच्या अहमदपूर येथे पाचारण करण्यात आले आहे.
दैव बलवत्तर! पुरात अडकलेल्यांची सुटका- अपडेट्स
शिरूर अनंतपाळ येथे नदीकाठावरील शेडमध्ये अडकलेल्या पाच व्यक्तींना स्थानिक पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे.
अहमदपूर तालुक्यातील मौजे काळेगाव येथील साठवण तलावाच्या सांडव्यावर अडकलेल्या एका व्यक्तीची तातडीने सुटका करण्यात आली.
शिरूर अनंतपाळ येथील घरणी नदीवरील पुलाच्या बांधकामादरम्यान पाण्यात अडकलेल्या तीन मजुरांना स्थानिक पथकाच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
मौजे माकणी येथे गावाजवळील पुलावरून जाताना पाण्यात वाहत गेलेल्या दौलत गोपाळ डोंगरगावे यांना स्थानिक गावकऱ्यांनी वाचवले. त्यांना किरकोळ दुखापती झाल्याने सध्या शिरूर ताजबंद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, बचाव कार्यासाठी लष्कर मदतीला
नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने जिल्ह्यात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यातील नायगाव, बिलोली, मुखेड, देगलूर, लोहा, कंधार, नांदेड या तालुक्यांना फटका बसला होता. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. नांदेड हैद्राबाद देगलूर उदगीर नरसी बिलोली रस्ते बंद पडले होते . देगलूर नायगाव मुखेड तालुक्यातील 3 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्याला आज हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लष्कराला पाचारण करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. तर जालना शहरासह जिल्ह्यात रात्रभरापासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी- नाल्याना पूर आला आहे.
लातूर, नांदेड जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर
लातूर : जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 60 पैकी 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. या पावसामुळे नदी, ओढ्यांची पाणी पातळी वाढून रस्ते, पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 49 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे.
या धर्तीवर आज 29 ऑगस्ट 2025 रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना उद्या, 29 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिली. तर नांदेड जिल्ह्यातही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर, वसनत, औंढ्यात सुट्टी जाहीर
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा , कळमनुरी तालुक्यात रात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे.पावसाचा जोर वाढल्याने व वसमत , औंढा तालूक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आज 29 ऑगस्ट 2025 रोजी, शुक्रवारी वसमत , औंढा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.