काका-पुतणे आधीपासून एकत्र, माझ्याकडे अनेक पुरावे; बच्चू कडूंच्या दाव्याने खळबळ….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांचा गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार आणि शरद पवार पवार गेल्या महिन्याभरात अनेक कार्यक्रमांमध्ये दिसून आले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच सहकार परिषदेच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले होते. यावेळी मंचावर असतानाच शरद पवार यांनी अजित पवारांच्या कानात गुफ्तगू केल्याने राष्ट्रवादी एकीकरणाच्या चर्चा आणखी बळावली. अशातच प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते आधीपासून एकत्र असून माझ्याकडे अनेक पुरावे असल्याचा दावा केला आहे.
बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते की, राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार हे कधीही एकमेकांपासून दूर झालेले नाहीत, ते आतून एकच आहेत. खरं तर शरद पवार आणि अजित पवार हे दोघे कधीही एकमेकांपासून दूर झाले होते, याची मला तरी खात्री होत नाही. आता दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र हे केवळ सत्तेसाठी चालले आहे, असे वाटते. परंतु दोन्ही पक्ष पुन्हा एक आले काय, किंवा नाही आले काय? यामुळे सामान्य जनतेला काही फरक पडत नाही. असे वक्तव्य केल्यानंतर आता बच्चू कडू यांनी दोन्ही नेते एकत्र असल्याचे त्यांच्याकडे पुरावे असल्याचे म्हटले आहे.
बच्चू कडू यांना पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याची गरज काय? कारण ते आधीपासून एकत्र आहे. यासंदर्भात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. जशी चाणक्य नीती आहे, तशी पवार नीती आहे, असे म्हणत बच्चू कडू यांनी दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येणाऱ्या काळात शरद पवार आणि अजित पवार खरंच एकत्र येणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.