महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपीटचा इशारा, पुणे-मुंबईसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलीय. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं झोडपलं असून मोठ्या प्रमाणावर पीकांचे नुकसान झालंय. मे महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्यानं दिलासा मिळालाय.
तर हवामानात मोठा बदल झाला आहे. दरम्यान, पुणे, मुंबई, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. दुसरीकडे नाशिक आणि सातारा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर अहिल्यानगर आणि पुण्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड यासह विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्याने राज्यातील बहुतांश भागात वातावरणात गारठा निर्माण झाला असला तरी काही भागात तपामानाचा पारा वाढला आहे. ब्रह्मपुरीत ४२.१ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ४१.२ अंश तर वर्धा ४० अंश इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात व पावसाच्या शक्यतेमुळे काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
पुणे आणि मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात चार दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे शहरात सखल भागात पाणी साचून वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. पश्चिम बंगालपासून झारखंड, विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमा, तसेच मराठवाडा, कर्नाटक ते केरळ या संपूर्ण पट्ट्यात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून, त्यामुळे राज्यभर पूर्वमोसमी पावसाचे सावट आहे.