भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या सहा हवाई तळांचे मोठे नुकसान….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान सहा एअरबेसवरील धावपट्ट्या मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्या, असा निष्कर्ष The Washington Post ने उपग्रह छायाचित्रे व व्हिडिओंच्या विश्लेषणातून काढला आहे.
या प्रकारचे हल्ले गेल्या अनेक दशकांतील दक्षिण आशियातील प्रतिस्पर्धी राष्ट्रांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दोन डझनांहून अधिक उपग्रहांची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहता, भारताच्या हल्ल्यांमुळे तीन हँगर, दोन धावपट्ट्या आणि एअरफोर्सच्या दोन मोबाईल युनिट्सचे गंभीर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील काही ठिकाणे पाकिस्तान हद्दीच्या आत १०० मैल इतक्या अंतरावरती होती.
“१९७१ च्या युद्धानंतर पाकिस्तानच्या लष्करावर भारताचे हे सर्वात मोठे हवाई आक्रमण होते,” असे मत किंग्स कॉलेज लंडनमधील आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक आणि दक्षिण आशियातील सुरक्षा विषयांचे अभ्यासक वॉल्टर लॅडविग यांनी व्यक्त केले.
“हाय-प्रोफाईल लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्यात आले. यामागे पाकिस्तानच्या आक्रमक आणि संरक्षणात्मक हवाई क्षमतेवर मोठा आघात करणे, हाच उद्देश होता,” असे उपग्रह प्रतिमांवर संशोधन करणाऱ्या Contested Ground या संस्थेतील विश्लेषक विल्यम गुडहाइंड यांनी सांगितले.
मिडलबरी कॉलेजमधील ईस्ट एशिया नॉनप्रोलिफरेशन प्रोग्रॅमचे संचालक जेफ्री लुईस यांनी नमूद केले की, “एअरबेसचे नुकसान झाले, परंतु एअरबेस पूर्णतः निष्क्रिय झाले असे म्हणता येणार नाही.”
हल्ल्यांनंतर भारताने पाकिस्तानमधील ११ बेसवर हल्ला केल्याचा दावा केला, ज्यातील काही ठिकाणी The Washington Post ने नुकसान झाल्याची खात्री केली आहे.
पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सुरुवातीला पत्रकारांना सांगितले की, बेसवर नुकसान झाले आहे, परंतु त्यांनी विस्तृत माहिती दिली नाही. लष्कराने नमूद केल्याप्रमाणे पाकिस्तानच्या एअरफोर्सचे सहा सदस्य मारले गेले.
चौधरी यांनी The Post ला सांगितले की, “भारतीय क्षेपणास्त्रांचे बरेच हल्ले पाकिस्तानच्या लष्कराने अडवले. यातले काही हल्ले यशस्वी झाले ,” हे त्यांनी मान्य केले. पाच बेस आणि एका नागरी विमानतळावर हल्ल्याची खात्री लष्कराने केली. एक विमानाचे किरकोळ नुकसान झाल्याचे चौधरी यांनी सांगितले.
“उपग्रह चित्रांच्या आधारे दिसते की भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या पूर्व भागातील विविध बेसवरकाही प्रमाणात नुकसान केले,” असे युनिव्हर्सिटी ऑफ अल्बानी येथील प्राध्यापक आणि भारत-पाकिस्तान संघर्षावरील पुस्तकाचे लेखक ख्रिस्तोफर क्लॅरी यांनी म्हटले.
शनिवारी झालेल्या भारतीय हल्ल्यांनंतर पाकिस्तानने त्वरित प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान सरकारने सांगितले की, त्यांनी भारतीय अधिकृत काश्मीर आणि पंजाब राज्यातील विविध एअरबेसवर हल्ले केले. भारताने मात्र हे दावे नाकारले नाहीत किंवा त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.
पाकिस्तानच्या दाव्यानुसार त्यांनी ७ मे रोजी भारताचे पाच युद्धविमाने पाडली, परंतु भारताने यावर कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही. The Post च्या विश्लेषणात किमान दोन भारतीय लढाऊ विमाने दुर्घटनाग्रस्त झाल्याचे दिसते.
शनिवारी झालेल्या संघर्षामुळे वॉशिंग्टनमध्ये चिंता वाढली होती, जिथे अधिकाऱ्यांना वाटले की, अण्वस्त्रसज्ज दोन्ही देश आता युद्ध करू शकतात. काही तासांनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, “भारताने सध्या हल्ले थांबवले आहेत, परंतु आणखी एखादा दहशतवादी हल्ला झाल्यास आम्ही पुन्हा कारवाई करू”. २२ एप्रिलला पहलगाम हत्याकांडाचे संबंध पाकिस्तानशी जोडले गेले होते. पाकिस्तानने मात्र यामध्ये आपला काही सहभाग नसल्याचे सांगितले आणि आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली.
रावळपिंडीजवळील नूर खान एअरबेसवर दोन मोबाईल कंट्रोल सेंटर उद्ध्वस्त झाल्याचे गुडहाइंड यांनी उपग्रह चित्रांवरून सांगितले. त्याच्या जवळच्या पार्किंगमध्ये धुराचे लोट दिसून येत आहेत.
नूर खान एअरबेस पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाची मानला जातो, कारण तो लष्कराचा मुख्य वाहतूक केंद्र आहे. हा बेस Strategic Plans Division च्या जवळ आहे, जिथे पाकिस्तानच्या १७० अण्वस्त्रांचा साठा ठेवलेला आहे.
रावळपिंडीमध्येच लष्कराचे जनरल हेडक्वार्टर्स आणि जॉइंट स्टाफ हेडक्वार्टर्स सुद्धा आहेत. “या प्रकारचा हल्ला देशाच्या नियंत्रण केंद्रावर थेट हल्ला असल्याचा समज निर्माण होऊ शकतो,” असे एका लष्करी संशोधकाने सांगितले, मात्र त्यांनी आपले नाव गुप्त ठेवले.
पाकिस्तानच्या भोलारी आणि शाहबाज एअरबेसवर विमानांचे हँगर मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याचे उपग्रह चित्रांवरून दिसते. भोलारीत एका हँगरच्या छतावर सुमारे ६० फूट रुंद भोक पडले आहे, जे क्षेपणास्त्राचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भोलारीमध्ये सामान्यतः Saab 2000 AEW&C हे महागडे, देखरेख करणारे विमान असते. हल्ल्याच्या वेळी ते आत होते का, याची माहिती अद्याप उपलब्ध नाही.
शाहबाज एअरबेस, जो पूर्णतः लष्करी वापरासाठी आहे, येथे देखील १०० फूट रुंद खड्डा आणि नियंत्रण मनोऱ्याचे नुकसान दिसते. दक्षिणेकडे असलेल्या सुक्कुर विमानतळावर देखील एक हँगर कोसळलेला दिसतो आणि रडार यंत्रणा नष्ट झालेली दिसते.
मुशाफ एअरबेस आणि शेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील धावपट्ट्यांमध्येही मोठे खड्डे पडले. Planet आणि Maxar या उपग्रह कंपन्यांच्या प्रतिमांमध्ये हे खड्डे दुसऱ्या दिवशी दुरुस्त केले जात असल्याचे दिसते.
पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले की, भोलारी येथे पाच आणि मुशाफ येथे एक हवाई दलाचा जवान मृत्यूमुखी पडला.
शेख झायेद विमानतळावरील Royal Lounge ला मोठे नुकसान झाले आहे.
“पाकिस्तानच्या मुख्य भागात इतक्या लष्करी सुविधा एकाचवेळी लक्ष्य करणे ही भारताच्या धोरणातील स्पष्ट बदलाची खूण आहे,” असे लॅडविग म्हणाले. याआधी भारताचे हवाई हल्ले प्रामुख्याने काश्मीर किंवा पाकिस्तानातील दूरच्या भागांपुरते मर्यादित होते.
“आता भारत दहशतवादी हल्ल्यांना पारंपरिक लष्करी प्रतिउत्तर देण्याचे कारण मानू लागला आहे,” असे लॅडविग यांनी सांगितले