हिम्मत असेल तर रोजगार वाढवा खासदार सातवांचा मोदींना टोला
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहेत. उद्योगधंदे बंद होऊन अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी वाढली आहे. याच मुद्दय़ावरून काँग्रेसने हिंमत असेल तर रोजगार वाढवा, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नव्या लूकचा संदर्भ देत त्यांच्यावर नाव न घेता टीका केली. पंतप्रधानांनी सध्या दाढीमिशा वाढवलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने हिंमत असेल तर जीडीपी, रोजगार वाढवा. दाढी मिशा तर कोणीही वाढवू शकतो, असे एक खोचक ट्विट करत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.राहुल गांधी यांचा सूचक इशारा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून सातत्याने चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयी बोलत आहेत. मात्र त्याकडे मोदी सरकार दुर्लक्ष करत आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. मी त्यांना कोरोना आणि अर्थव्यवस्थेबद्दल इशारा देत राहिलो. पण, त्यांनी तो नाकारला. त्यानंतर आपत्ती आली. आताही मी त्यांना चीनबद्दल इशारा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.