पालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंचा स्वबळाचा नारा; जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ग्राऊंडवर कार्यकर्त्यांचं.”

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीत खटके उडायला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून आघाडीतील तिनही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
यातच पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. तसंच, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आता स्वबळाचा नारा दिला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? पण विधानसभेच्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे. त्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतोय. ग्राऊंडवर कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे आम्हाला माहितेय. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे असं वाटत नाही. शेवटी बळंच कोणाला तरी घेऊन जाणं आम्हाला पटणारं नाही.”
“अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. व्यक्तिगत पक्षाला संधी मिळत नाही, असं नाही. आमच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. आपण मतविभागणीचा फटका लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पाहिला आहे. मतविभागणीमुळे आपल्या ४५ जागा गेल्या आहेत. पण त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही, कारण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. परंतु, आगामी पालिका निवडणुकीत याचा फटका १०० टक्के बसणार आहे”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महापालिकेच्या निवडणुकीबाबत राऊतांनी काय घोषणा केली?
“मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आजमावायचंच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. आमचं असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.