अकरावीच्या प्रवेशावेळी यंदा वादाची चिन्हे
मूल्यांकनामुळे ‘सीबीएसई’च्या तुलनेत राज्यमंडळाचे विद्यार्थी मागेच राहणार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांमधील अकरावी प्रवेशाची स्पर्धा यंदाही वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. मूल्यांकनाच्या पद्धतीतील तफावतीमुळे सीबीएसईचे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत आघाडीवर असतील, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न झालेल्या विषयांसाठी सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयांच्या गुणांची सरासरी काढून गुण देण्यात येणार आहेत. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची भूगोलाची परीक्षा रद्द झाली. त्यासाठी सर्व विषयांच्या लेखी परीक्षेच्या गुणांची सरासरी काढून गुण देण्यात येणार आहेत. प्रवेशासाठी सर्वोत्तम पाच विषयांचे गुण गृहीत धरले तरीही सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या गुणांच्या सरासरीनुसार पाच विषयांचे गुण ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत. त्याचवेळी गुण मिळवण्यासाठी भाषांच्या तुलनेत सोप्या वाटणाऱ्या समाजशास्त्रात किती गुण मिळू शकतील, याबाबत अद्याप संदिग्धता आहे.
गेल्यावर्षी काय घडले?
गेल्यावर्षी राज्य मंडळाचा दहावीचा निकाल घटला होता. उत्तीर्णाचे प्रमाण कमी होण्याबरोबरच चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही कमी झाले. त्याचवेळी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे निकाल वाढले. त्यामुळे विशेषत: मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याचे प्रमाण अधिक होते. त्यावर उपाय म्हणून महाविद्यालयांना दहा टक्के जागा वाढवून देण्याची वेळ आली होती.
तफावत कशी ? सीबीएसई आणि राज्य मंडळ यांच्या मूल्यांकनातील तफावतीमुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडण्याची शक्यता मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाही सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रवेशाच्या स्पर्धेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.