आयुक्त बदल्यांचा राज्यातील सत्ताधारी पक्षांनाच फटका
शिवसेना, राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यात नाराजी; सनदी अधिकाऱ्यांच्या नेमणुकीला विरोध
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्याने राज्य सरकारने ठाणे जिल्ह्य़ातील नवी मुंबई, मीरा-भाईंदर व उल्हासनगर महापालिकेतील प्रशासकीय प्रमुखांची मंगळवारी तडकाफडकी बदली करत या शहरांची धुरा थेट सनदी सेवेतील अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे जनसामान्यांतून स्वागत होत असले तरी, राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे असून या दोन्ही महापालिकांमधील प्रशासकीय प्रमुखांच्या माध्यमातून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांत या शहरांमधील राजकीय खुंटा मजबूत केल्याचे चित्र होते. मीरा-भाईंदर शहरातील महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली तरी तेथेही आयुक्त चंद्रकांत डांगे हे शिंदे यांच्या खास मर्जीतील मानले जातात. असे असताना नवी मुंबईत जेमतेम वर्षांचा कालावधी मिळालेले अण्णासाहेब मिसाळ आणि तीन महिन्यांपूर्वीच मीरा-भाईंदर येथे नियुक्त झालेले डांगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने शिवसेनेच्या आणि विशेषत: एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी जोरदार मोर्चेबांधणीस सुरुवात केली होती. भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावण्याची स्पर्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू होती. याच काळात आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि पालकमंत्र्यांचा उत्तम संवाद असल्यामुळे भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता होती. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने मिसाळ, डांगे आणि उल्हासनगरचे नवे आयुक्त संजीव उन्हाळे या तिघांची तातडीने बदली केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बदल्यांमध्ये राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांची भूमिका महत्त्वाची असल्याची चर्चा असून त्याचा राजकीय फटका शिवसेनेला बसू शकेल, अशा तक्रारी मंगळवारी नवी मुंबई, मीरा-भाईंदरमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रवादीही आक्रमक
नवी मुंबईत अण्णासाहेब मिसाळ यांची बदली होताच राष्ट्रवादीच्या ठाण्यातील नेत्यांनी मुख्यमंत्री तसेच पक्षाच्या वरिष्ठांकडे स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना मिसाळ यांची बदली करणे गणेश नाईक यांच्या पथ्यावर पडणारे ठरेल, अशी भूमिका या नेत्यांनी वरिष्ठांकडे मांडल्याचे समजते.
दोन ‘विजय’ अबाधित
नवी मुंबई, मीरा-भाईंदरप्रमाने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रांतही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. महत्त्वाचे म्हणजे शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात तर करोनाचा सामना करताना महापालिका स्तरावर सावळागोंधळ असून आयुक्त विजय सिंघल आणि नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या अतिरिक्त आयुक्तांची अजूनही म्हणावी तशी पकड बसलेली नाही. असे असताना इतर शहरांमधील प्रशासकीय प्रमुखांची बदली करताना सरकारने थेट सनदी सेवेतील सिंघल यांच्यावर मात्र कृपादृष्टी कायम ठेवल्याचे चित्र आहे. कल्याण- डोंबिवलीत डॉ. विजय सूर्यवंशी रुग्णसंख्या वाढूनही तूर्तास अभय मिळाल्याने पालकमंत्री शिंदे यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला.