मराठी युवकांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा; रोहित पवारांचं आवाहन
येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केला होता. त्यामुळे सर्व अर्थ व उद्योगचक्र ठप्प झालं होतं. त्याचा परिणाम मजुरांवर झाला होता. या काळात लाखो मजुरांनी आपापल्या गावाकडे स्थलांतर केलं. मात्र, लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल होताच, मजूर परत येण्यास सुरूवात झाली आहे. पुणे शहरातही मोठ्या संख्येनं मजूर येत असून, यापार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी राज्यातील युवकांना आवाहन केलं आहे.
लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केल्यानंतर अनेक उद्योग व व्यवसाय सुरू झाले आहेत. पुण्यासारख्या शहरातही उद्योगचक्र हळूहळू फिरू लागले आहे. त्यामुळे मजूर परत येऊ लागले असून, आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील युवकांना कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी रूजू होण्याचं आवाहन केलं आहे. “पुण्यासारख्या शहरात रोज १७ हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात. त्यामुळे मराठी युवकांनी तातडीनं कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा. अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला, पण अजून देण्याची गरज आहे. कोणतंही काम लहान मोठं नसतं,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पुण्यासारख्या शहरात रोज १७ हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत.त्यामुळं येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात. त्यामुळं मराठी युवांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा. अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला,पण अजून देण्याची गरज आहे.कोणतंही काम लहान-मोठं नसतं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 23, 2020
पुणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीप्रमाणे लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर शहरात उत्तर भारतातून जवळपास ८ हजार स्थलांतरित मजूर परत आले आहेत. ही संख्या १ जूनपर्यंतची आहे. रेल्वे मंत्रालयानं काही महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मार्गावर रेल्वे सेवा सुरू केल्यानंतर मजूर परतू लागले आहेत. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातून १ लाख २० हजार मजुरांनी स्थलांतर केलं होतं