स्वाभिमानी नेत्यांची नाराजी दूर, राजू शेट्टी विधान परिषदेत जाणार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेत आमदार म्हणून जाण्याच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नाराजी नाटय़ सुरू झाले होते. मात्र या वादावर आता तोडगा निघाला असून माजी खासदार राजू शेट्टी यांनीच विधान परिषदेत जावं, अस एकमताने ठरविण्यात आले आहे.
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून आमदार होण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने माजी खासदार राजू शेट्टी यांना दिला होता. याबाबत शेट्टी यांनी बारामतीत जाऊन शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव स्वीकारला.मात्र यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील काही नेत्यांत नाराजी व मतभेद असल्याचे समोर आले होते. यामुळे अस्वस्थ झालेल्या शेट्टी यांनी स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधान परिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच, अशी भूमिका घेतली होती.
विधान परिषद उमेदवारीवरून स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांत निर्माण झालेले मतभेद व नाराजी याबाबत शुक्रवारी रात्री कोल्हापूर येथे बैठक झाली. या बैठकीत संघटनेचे नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आणि सावकार मादनाईक यांच्याशी चर्चा करून वाद मिटवण्यात आला आहे. शेतकऱयांच्या व्यापक हितासाठी संघटनेतील एकजूट कायम ठेवत शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्वाभिमानी हा एक परिवार आहे. माझ्या उमेदवारीच्या चर्चेनंतर काही नेते नाराज झाले होते. त्यामुळे संघटनेच्या कोणत्याही सदस्याच्या मनात शंका निर्माण झाली असेल तर मी ही उमेदवारी स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र आता संघटनेत एकमत झालं असून सर्व वाद मिटला आहे.
– राजू शेट्टी, माजी खासदार