उद्धव ठाकरे व फडणवीस यांची तत्पर भेट चक्रीवादळाच्या नुकसानीवर चर्चा आणखी काही राजकारण?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोकणात चक्रीवादळाने घातलेल्या थैमानाची पहाणी करून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुंबईत परतताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटीसाठी त्यांना बोलावणे आले. त्याप्रमाणे फडणवीस यांनी ठाकरे यांची भेटही घेतली.भेटही अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात झाली. कोकणातील नुकसानीची पाहणी करून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन कोकणासाठी नेमके काय केले पाहिजे याचे निवेदन दिले. अर्थात काय करायचे याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील.
विरोधी पक्षाला कोरोना संकटाला दीड महिना लोटला आहे. पहिला कोरोना, त्यांनतर लॉकडाऊन.सत्तर दिवसानंतर भाजपने सरकारला लक्ष्य करणे या गोष्टी घडत गेल्या. एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे निसर्गचा तडाखा कोकणाला बसला. कोकणची पाहणी आतापर्यंत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यापाठोपाठ फडणवीस कोकणात जाऊन आले.
फडणवीस हे आज मुंबई दाखल होताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावले. दिड महिना उलटल्यानंतर चर्चेसाठी बोलावणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेमागे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसला इशारा देण्याचा विचार तर नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जातो आहे.
विधान परिषदेतील नामांकन ,कोरोना हाताळणी या विषयात महाविकास आघाडीतील घटक पक्ष दररोज निरोप पाठवत असताना ठाकरेंनी स्वत:च फडणवीसांना निरोप पाठवला. ठाकरे आणि फडणवीस खरे तर भाजप शिवसेनेतील संबंध सुमधूर होण्याची कामना बाळगणाऱ्या काही मंडळींनी ही बातमी लगेच माध्यमात पोहोचवल्याने कुजबूज अधिकच वाढली आहे.
मुख्यमंत्री रात्री अपरात्री फोन घेत नाहीत, त्यांना भेटायचे असेल तर फोनवर संवाद करणेही कठीण असते अशी बड्या नेत्यांचीही खासगीतील तक्रार. त्यावर मात करत आज राजकारण तर केले नाही ना असा प्रश्न केला जातो आहे. कोकणातील मदतकार्यात आढळणाऱ्या त्रुटींबद्दल सरकारला अहवाल सादर करू अशी घोषणा भाजपने केली होती. त्याचा आधार घेत आज हे भेटीचे निमंत्रण देण्यात आले का ? असा प्रश्नही यानिमित्ताने केला जात आहे.