महाआघाडीत बिघाडी! काँग्रेसचे नेते आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. यामुळे आता काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. शुक्रवारी रात्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. काँग्रेसच्या नाराजीच्या कारणांबाबत आज चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी थोरात यांना दिले. त्यामुळे आज बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
काँग्रेसला सरकारमध्ये मिळत असलेले दुय्यम स्थान, निर्णय प्रक्रियेतील सहभाग, विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांचे वाटप यावर या बैठकीत चर्चा होईल दरम्यान काँग्रेसचे मंत्री सुनिल केदार यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र ही भेट त्यांच्या खात्यातील काही विषयासंदर्भात होती. काँग्रेसच्या विषयाबाबत सुनिल केदार मुख्यमंत्र्यांना भेटले नसल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महाविकास आघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची गुरुवारी मुंबईमध्ये बैठक झाली. आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देण्यात यावे, अशी मागणी या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी केली होती. या बैठकीनंतर आता काँग्रेस नेते त्यांची तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत.
काय आहेत काँग्रेसच्या नाराजीची कारणे?
महाविकास आघाडी सरकार चालवताना निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी केले जात नसल्याचा आक्षेप काँग्रेस नेते आणि मंत्र्यांचा आहे. कोरोनाच्या संकटात घेण्यात येत असलेले निर्णय तिन्ही पक्षांशी चर्चा करून घेणे काँग्रेसला अपेक्षित आहे. सध्याच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसते, अशी काँग्रेसची धारणा झाली आहे. त्यामुळे सरकारमध्ये अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची खदखद काँग्रेसमध्ये आहे. आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद न मिळाल्याने, विधान परिषदेत एक जागा कमी मिळाल्यामुळे आणि आता निर्णय घेताना स्थान मिळत नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे.