काँग्रेसने महाराष्ट्र सरकारला दिलेला पाठिंबा काढून टाकावा, आठवलेंचा सल्ला
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महाराष्ट्र सरकारमध्ये जर काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर काँग्रेसने राज्य सरकारला दिलेला पाठिंबा काढून टाकावा’, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र काँग्रेसला दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकासाआघाडी सरकारमध्ये काँग्रेस नेते आणि मंत्र्यांची नाराजी जाहीरपणे समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर, रामदास आठवलेंनी या वादात उडी घेतली आहे. ‘महाराष्ट्रात तिघाडी सरकार मध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे.मात्र काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी काँग्रेसने व्यक्त केली आहे.काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा’, असे ट्विट करत रामदास आठवले यांनी काँग्रेस पक्षाला हा सल्ला दिला आहे. दरम्यान, रामदास आठवलेंच्या या सल्ल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस आणि महाविकासआघाडी सरकरकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेमहाविकासाआघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना योग्य ते महत्त्व मिळत नसल्याने ही नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसची तातडीची बैठक झाली. दरम्यान, या बैठीकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.’नक्कीच काही मुद्दे आहेत. काँग्रेसला सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे. ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू’, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या तुलनेत काँग्रेसच्या नेत्यांना तसेच मंत्र्यांना आवश्यक ते महत्त्व मिळत नसल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत धुसफूस असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता रामदास आठवलेंनीही या प्रकरणात पडत काँग्रेसला ‘आपला पाठिंबा काढण्याचा’ सल्ला दिला आहे.
राहुल गांधींचे ‘ते’ सूचक वक्तव्य
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र काँग्रेसबाबत एक अत्यंत मोठे वक्तव्य केले होते. ‘महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचे अधिकार नाही’,असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. ‘महाराष्ट्रामधील सरकारला काँग्रेसने समर्थन दिले आहे. मात्र, महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णय घेण्याइतके अधिकार नाही’, असे राहुल गांधी म्हणाले होते. पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘महाराष्ट्रातील सरकारला आम्ही समर्थन दिले आहे. पण महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार नाहीत. एखादे सरकार चालविणे आणि सरकारला पाठिंबा देणे ह्यात मोठा फरक आहे. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे’, असे राहुल गांधी म्हणाले होते.