राहुल गांधींची ‘गॅरंटी’ मोदींकडून ‘कॉपी’ : जयराम रमेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “‘गॅरंटी’ हा शब्द काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी वापरला. कर्नाटक, तेलंगणाच्या निवडणुकीत त्यांनी काही ‘गॅरंटी’ योजनांची घोषणा केली व सरकार आल्यानंतर त्या योजना लागू झाल्या.
त्या वेळी मोदींनी त्यांची खिल्ली उडविली होती. आता तेच मोदी गॅरंटी म्हणताहेत. मात्र, दहा वर्षांत त्यांनी काहीही केले नाही, अशी टीका माजी मंत्री तथा काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रानिमित्ताने धुळ्यात रोड शो, महिला न्याय हक्क परिषद झाली. यानंतर श्री. रमेश यांची पत्रकार परिषद झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, आमदार प्रणिती शिंदे, प्रतिभा शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रवक्ते अतुल लोंढे, माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी आदी उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व खासदार गांधी यांनी घोषणा केलेली ‘नारी न्याय गॅरंटी’ ऐतिहासिक असल्याचे जयराम रमेश म्हणाले. किसान न्याय, हिस्सेदारी न्याय, युवा न्याय, नारी न्याय, श्रमिक न्याय अशा या गॅरंटी एका व्यक्तीकडून नव्हे, तर काँग्रेसकडून आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या या न्याय गॅरंटी स्किमच्या माध्यमातून वीस सूत्री कार्यक्रम घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार असल्याचे श्री. रमेश म्हणाले.
पाच गॅरंटी, २० कार्यक्रम
श्री. रमेश यांनी काँग्रेसच्या पाच गॅरंटी स्किमची माहिती दिली. त्या अशा ः किसान न्याय गॅरंटी ः यात ‘एमएसपी’ला कायदेशीर दर्जा, खर्चावर आधारित शेतमालाला दीडपट भाव, कर्जमाफी आयोग गठीत करून कर्जमाफी देणे, प्रधानमंत्री फसल बिमा योजना पूर्णपणे बदलून ती कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांच्या फायद्याची करणे.
हिस्सेदारी न्याय गॅरंटी ः जातीजनगणना व विविध संस्थांचे सर्वेक्षण, ५० टक्के आरक्षणाची सीमा ओलांडण्यासाठी संविधान संशोधन, बजेटमध्ये एससी, एसटींसह इतर घटकांच्या लोकसंख्येनुसार तरतूद करणे. युवा न्याय गॅरंटी ः भरती भरोसा, ॲप्रेंटेनशीप कायदा, पेपरफुटी मुक्तीसाठी कायदा, स्टार्टअप, व्यवसायांसाठी ‘शुरुवात कोश’ यात पाच हजार कोटींची तरतूद.
नारी न्याय गॅरंटीमधील पाच स्किम तसेच श्रमिक न्याय गॅरंटीतील तीन स्किम असे एकूण २० सूत्री कार्यक्रम असल्याचे श्री. रमेश यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत हेच खरे मुद्दे आहेत, हेच मुद्दे घेऊन काँग्रेस व इंडिया आघाडी लढणार असल्याचे श्री. रमेश म्हणाले. आमचे सरकार आल्यास अग्निवीर योजना पुढे सुरू ठेवणार नाही, ही योजना देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने धोका असल्याचेही ते एका उत्तरात म्हणाले.