“4 जूनला धमाका होणार आणि मी तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होणार” ; नारायण राणेंचा विश्वास….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महायुतीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी अतिशय मेहनतीने काम केल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपला यश मिळेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरीत व्यक्त केला.
मंगळवारी (ता. ७) मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मंत्री राणे यांनी रत्नागिरीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्या आधी त्यांनी महायुतीच्या निवडणूक कार्यालयाला भेट देऊन सर्व कार्यकर्ते, आणि लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले तर भाजपच्या (BJP) विजयाचे शिल्पकार हे सर्वचजण असल्याचे स्पष्ट केले.
महायुतीतील तिन्ही पक्षाच्या सगळ्याच लोकांनी चांगले काम केलं. त्यामुळे वातावरण सकारात्मक आहे. या मतदार संघातून लढण्याची संधी दिल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद देतो.
महायुतीच्या प्रत्येकाने चांगले काम करत असतानाच रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते किरण सामंत यांनीही चांगले काम केले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात मतदान ६० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. ते महायुतीसाठी चांगले आहे. ४ जूनला धमाका होणार आणि तीन लाखांपेक्षा जास्त मते घेऊ असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.