शरद पवार यांना हवा तसं करतात , दाखवतात मात्र…; अजित पवारांचं मोठं विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- शरद पवार यांनी पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलंय. “शरद पवार यांच्या मनात असते तोच निर्णय ते घेत असतात.
ते कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना हवं तसं ते करतात.”, असं अजित पवार पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले. मी शरद पवारासांबोत फार जवळून काम केलंय. त्यांच्या कामाची पद्धत मला माहितीय. शरद पवार अनेकदा संभ्रमावस्था निर्माण करणारी विधाने करतात. उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील असं वाटत नाही. शरद पवारांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि तो सामुहिक निर्णय असल्याचं दाखवतात असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी पुढे म्हटलं की, आम्ही निर्णय घेतला तेव्हा ते एकटेच विरोध करत होते. त्यांना हवा तोच निर्णय ते घेतात आणि फक्त दाखवतात की तो निर्णय सामुहिक आणि चर्चा करून घेतला आहे. शरद पवार कुणाचंही ऐकत नाहीत, ते मनाला वाटेल ते करतात आणि त्यांचा तो स्वभाव बदलणं शक्य नाही.
शरद पवारांवर थेट टीका करताना अजित पवार यांनी म्हटलं की, किमान भाजप बरोबर जाण्याची चर्चा झाल्याचं शरद पवार कीमान आता मान्य करत आहेत. सहा सहा मिटींग झाल्या भाजप सोबत जाण्याच्या मुद्द्यावर, जर जायचे नव्हते तर मिटींग का झाल्या? पक्ष सोडलेल्यांना नो एन्ट्री असं म्हणतात पण निलेश लंकेंना परत घेतली नाही का? हे फक्त बोलण्यासाठी असतं. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो.
बारामतीत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांचा पराभव करणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर अजित पवार यांनी म्हटलं की, चंद्रकांत पाटलांची चूक झाली हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही बारामतीत येऊ नका. आम्ही पाहतो. त्यानंतर ते चुप आहेत.