‘भाजपाने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवली, वापर करायचा अन् नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकायचं’ ; विनायक राऊतांचा टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपाच्या नितीचा प्रत्यय नारायण राणेंना आला आहे. जोपर्यंत वापर आहे तोपर्यंत वापर करायचा नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचे. भाजपने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
दुदैव एवढंच आहे की, अशोक चव्हाण यांना राज्यसभेची जागा दिली. त्यापेक्षा एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला हे दिलं असते तर ते भाजपला शोभले असते, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.
ज्या अशोक चव्हाण यांना कंटाळून नारायण राणे दूर गेले. त्यांच्याच सोबत आता नारायण राणेंना काम करावे लागणार आहे. शिंदे गटाची अवस्था वाईट होणार आहे. येत्या काही दिवसात शिंदे गटाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणार आहेत. कोट्यावधी रुपयांचे आरोप असतात ते भाजपवासी झाले की, ते धुतल्या तांदुळाप्रमाणे होतात. सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे, जरांगेच्या जिवाशी सरकार खेळतंय. त्यांची विचारफुस करायला देखील ते जात नाहीत. नारायण राणे जरांगेबद्दल जे बोलले ते अयोग्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हा राजकीय छंद बनलाय
आयकर विभागाने छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ आणि कुटुंबियांना दिलासा दिला आहे. याबाबत विनायक राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, जे जे भष्ट्राचारी आहेत त्यांनी भाजपच्या लॉन्ड्रीमध्ये जायचं, त्यांना मशिनमध्ये जायचं आहे आणि स्वच्छ होवून यायचे हा राजकीय छंद बनलाय, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपमुळे शिंदे गटाची गोची नाही ढेकूण झालाय
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत विनायक राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष काही वेगळा निर्णय देतील, अशी अपेक्षा नाही. शिवसेनेच्या बाबतीत जे झालं तेच आज होईल. असे त्यांनी म्हटले आहे. भाजपमुळे शिंदे गटाची गोची नाही ढेकूण झालाय, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
सरकार बेईमानी करतंय
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसागणिक खालवत आहे.बुधवारी जरांगे यांची तब्येत खालावली त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली, मात्र जरांगेनी सलाईन काढून टाकली. याबाबत विनायक राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, जिवाशी खेळण्याचे क्रुर पाप राज्य सरकार करतंय, एकनाथ शिंदे यांनी फसवलं आणि स्वतःचा टेंभा मिरवला, सरकार बेईमानी करत आहे, असा समाचार त्यांनी घेतला आहे.