अन्यथा मी सुद्धा आशा सेविकांसोबत उपोषणाला बसेन, सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आशा सेविका त्यांची सुख दु:ख, त्यांचे प्रश्न त्यांची आव्हानं मी फार जवळून काम पाहिलंय, कोविडमध्ये देशात ज्या प्रकारे जबाबदारीने काम केलं, तशा पद्धतीने कोणी करू शकणार नाही, त्यांना न्याय मिळाला नाही, वेळ पडली तर मी देखील त्यांच्यासोबत उपोषणाला बसेन असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
‘आशा सेविकांसोबत उभं राहणं आपल्या सर्वांचाची नैतिक जबाबदारी’ – सुप्रिया सुळे
आपल्या विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. मागील सात दिवसांपासून या आशा सेविका ठिय्या आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान आशा सेविकांनी माध्यमांसमोर व्यथा मांडली आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी सुप्रिया सुळे यांना विचारताच त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. त्या म्हणाल्या, आशा सेविकांची सुख दु:ख, त्यांचे प्रश्न त्यांची आव्हानं मी फार जवळून काम पाहिलंय, कोविडमध्ये देशात ज्या प्रकारे जबाबदारीने काम केलं, तशा पद्धतीने कोणी करू शकणार नाही, केंद्र सरकारचा आयुष्यमान भारत सारख्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू या आशा सेविका आहे, असं असतानाही दिवाळीपासून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्याच्या विरोधात आपण लढलं पाहिजे.
‘जर वेळ पडली तर उपोषणाला मी बसेन’
सुळे पुढे म्हणाल्या, आज आशा सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत. आधी आंगणवाडी सेविकाचं झालं. आता आशाताईचं आंदोलन सुरू आहे, त्यांच्यासोबत उभं राहणं आपल्या सर्वांचाची नैतिक जबाबदारी आहे. मात्र सरकारचं याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. त्यामुळे सरकार नेमकं कोण चालवतंय? असा प्रश्न निर्माण होतोय. आणि यात भरडल्या जातायत त्या मात्र आशा भगिनी, या भगिनींसाठी लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच आमची भूमिका आहे, पण जर न्याय मिळाला नाही, तर मी स्वत: रस्त्यावर उतरून त्यांच्यासोबत आंदोलन करेन, जर वेळ पडली तर उपोषणाला मी बसेन असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटंलय.
पक्ष हिसकावून घेण्याचे पाप आयोगाने केले आहे – सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय विरोधात गेला तर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे. आमचे आमदार अपात्र ठरले तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. कारण, निवडणूक आयोगाने या प्रकरणी पक्ष स्थापन करणाऱ्याचाच पक्ष हिसकावून घेण्याचे पाप केले आहे, असे त्या म्हणाल्यात.