मविआतील जागा वाटपाच्या निर्णयाची ‘डेडलाईन’ ठरली ; कसा असेल फार्म्युला…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका देखील होतांना पाहायला मिळत आहे.
मात्र, अद्याप मविआतील जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. तर, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा एक फेब्रुवारीपर्यंत मविआतील जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.
रमेश चेन्नीथला मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, आज ते नांदेड जिल्ह्यात असणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून विभागनिहाय आढावा बैठका घेऊन सूक्ष्म नियोजन केले जात असल्याचे म्हणत, महाविकास आघाडीतील जागा वाटप फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अंतिम होईल, अशी माहिती रमेश चेन्नीथला व नाना पटोले यांनी दिली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून हे नेते चर्चा करणार…
दरम्यान पुढे बोलतांना चेन्नीथला यांनी म्हटले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी व अन्य घटक पक्षांसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. तसेच, एक फेब्रुवारीपर्यंत जागावाटप अंतिम होईल. नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात आमच्याकडून या प्रक्रियेत असतील असेही चेन्नीथला म्हणाले.
नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटणार…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने जय्यत तयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दुपारी 2 वाजता येथील तरोडा स्थित भक्ती लॉन्समध्ये काँग्रेसकडून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील प्रमुख नेते नांदेड शहरात येत आहेत. हा महिला मेळावा म्हणजे नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आजची नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसची सभा महत्वाची समजली जात आहे.
व्होट शेअरनुसारच वंचितकडून जागा वाटपाची मागणी?
महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या सहभागावरून मागील काही दिवसांपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे. असे असतानाच व्होट शेअरनुसारच वंचितकडून जागा वाटपासंदर्भात मागणी होताना दिसणार आहे. महाविकास आघाडीकडून वंचितला दोन जागांची ऑफर दिली जाऊ शकते. अशात वंचित आघाडीकडून आकड्यांची गणितं समोर ठेवत अधिकच्या जागा लोकसभा निवडणुकीत पदरी पाडण्याचा विचार आहे. त्यामुळे यात त्यांना कितपत यश मिळणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.