२२ मेपासून नवीन आदेश जारी केला जाणार ?
व्यापाऱ्यांनी दिलेल्या पर्यायांचा विचार करू
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
संपूर्ण दुकाने उघडण्याची आजची परिस्थिती नाही. मात्र चेंबर ऑफ कॉमर्सने सुचविलेल्या पर्यायांचा निश्चित विचार केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले. शुक्रवार, २२ मेपासून नवीन आदेश जारी केला जाणार आहे. तूर्तास १७ मे रोजीच्याच आदेशानुसार व्यवहार चालतील, असे त्यांनी सांगितले.
चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यवतमाळ व स्थानिक प्रशासन यांच्यात मंगळवारी बैठक झाली. सुरुवातीला चेंबर ऑफ कॉमर्सने यवतमाळात कोरोना नियंत्रणात आणल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले. दरम्यान, लॉकडाऊन-४ मध्ये सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, असे निवेदन सादर केले.
या निवेदनावर चर्चा करण्यात आली. बाजारपेठ बंद असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याची बाजू प्रामुख्याने मांडण्यात आली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सने काही पर्याय सुचविले. बऱ्याच दिवसांपासून बाजार बंद असल्याने दुकाने उघडताच गर्दी होईल. कधी तरी ते होणारच आहे. दुकाने नियमित सुरू झाल्यास गर्दी ओसरेल, असे मत व्यापाऱ्यांनी यावेळी मांडले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेशात चेंबर आॅफ कॉमर्सच्या सूचनांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनांनी चेंबर ऑफ कॉमर्समार्फत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात दुकाने उघडण्याविषयी लेखी सूचना कराव्या, जेणेकरून त्यावर निर्णय घेता येईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रिकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया, सचिव गणेश गुप्ता, महेश करवा, मनिष मोर, संजय सूचक, सारंग भालेराव आदी उपस्थित होते.
एक-दोन क्रमांक पर्याय
पूर्ण दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, एक व दोन क्रमांक मार्किंग करून एक दिवस एक क्रमांकाची व दुसऱ्या दिवशी दोन क्रमांकाची दुकाने सुरू ठेवावी.
‘सम-विषम’वर भर
पहिल्या दिवशी उजव्या बाजूची, तर दुसऱ्या दिवशी डाव्या बाजूची दुकाने उघडू द्यावी. दर पाच दुकानांपैकी एक दुकान सुरू ठेवावे, असे पर्याय देण्यात आले.
दोन महिने दुकाने बंद असल्याने व्यापारी त्रस्त
व्यापाऱ्यांनी उन्हाळा व लग्नसराईचा सिझन ओळखून दुकानांमध्ये मोठा माल भरला होता. मात्र लॉकडाऊनमुळे हा सिझन आलाच नाही. आता दुकानातील व गोडावूनमधील माल तसाच पडून आहे. त्याची चिंता व्यापाऱ्यांना सातत्याने त्रस्त करीत आहे.